
कविता संतोष लोधे (वय ३५, रा. इंदिरानगर, वैजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. कविता आणि त्यांचे पती संतोष लोधे हे दोघेही मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी पती-पत्नी रात्रंदिवस मेहनत घेत होते. मात्र नियतीने एका क्षणातच त्या दोन निष्पाप मुलांच्या डोक्यावरचे आईचे छत्र हिरावून घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, कविता लोधे ही मंगळवारी शहरातील द्वारका लॉन्स परिसरालगत असलेल्या गट क्रमांक १५९/२ मधील शेतात पेरणीच्या कामासाठी मजुरीस गेली होती. दुपारच्या सुमारास ती इतर मजुरांसोबत काम करत असताना जेवणासाठी उठली. त्याचवेळी खालीपर्यंत लोंबकळणारी वीजतार तिच्या डोक्याला लागली. त्या तारेतून प्रवाहित होणारा विजेचा प्रवाह इतका तीव्र होता की, तिचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबाचा आधार असलेल्या महिलेचा काही क्षणांत मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली.
या दुर्घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की, शेतापर्यंत खाली लटकणाऱ्या वीजतारेबाबत महावितरण विभागाने वेळेत उपाययोजना का केल्या नाहीत? वीजतारांची नियमित तपासणी व आवश्यक दुरुस्ती करण्यात आली असती, तर आज ती महिला जिवंत असती, अशी भावना व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी ही केवळ दुर्घटना नसून विभागाच्या कथित हलगर्जीपणाचा परिणाम असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मृत महिलेचे नातेवाईक, आप्तेष्ट आणि मोठ्या संख्येने नागरिक महावितरण कार्यालयात दाखल झाले. त्यांनी विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. जबाबदारांवर कायदेशीर कारवाई होऊन न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली.
सायंकाळी सात वाजेपर्यंत महावितरण विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांचा रोष अधिकच वाढला. कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच विभाग का जागा होतो? अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. वेळेत वीजतारांची देखभाल करण्यात आली असती, तर एका गरीब कुटुंबावर ही वेळ ओढवली नसती, असेही त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर महावितरणचे अधिकारी आणि मृत महिलेच्या नातेवाईकांमध्ये अनेक वेळा चर्चा झाली; मात्र त्यातून कोणताही तोडगा निघू शकला नाही. विभागाच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळी एका जेसीबी चालकाने नाल्याचे खोदकाम केल्यामुळे वीजखांबाला दिलेला आधार सैल झाला आणि त्यामुळे वीजतार खाली लटकू लागली. संबंधित जेसीबी चालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून मृत महिलेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे विभागाने स्पष्ट केले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस प्रशासनानेही मोठा बंदोबस्त तैनात केला होता. उशिरापर्यंत नातेवाईक आणि नागरिक महावितरण कार्यालयात ठिय्या देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत होते. या घटनेमुळे सरकारी विभागांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.