
गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे (Photo Credit- X)
आंदोलन स्थगितीबाबत अधिकृत भूमिका मांडताना आमदार रोहित पवार म्हणाले, यापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपूरमध्ये दिलेला शब्द पाळला नव्हता, हा इतिहास आहे. मात्र, तरीही त्यांच्या मंत्रिपदाचा आणि शासनाचा मान ठेवत आम्ही पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. सकाळपासून या आंदोलनामुळे अनेक सामान्य नागरिक रस्त्यावर अडकले होते, तसेच आमचे पोलीस बांधवही कडक बंदोबस्तासाठी तैनात होते; त्यांच्या त्रासाचा विचार करून आम्ही हे आंदोलन तूर्तास स्थगित करत आहोत.
रोहित पवार यांनी सरकारला कडक शब्दांत इशारा दिला आहे की, आता मंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे उद्या मुंबईत कर्जमाफीच्या अटीशर्ती काढण्याबाबतच्या बैठकीचे नियोजन होईल, अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे. मात्र, जर महायुती सरकारने पुन्हा एकदा विश्वासघात केला, तर यापुढे त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवला जाणार नाही. तसेच, येत्या काळात संपूर्ण राज्यात यापेक्षाही अधिक मोठे आणि व्यापक जनआंदोलन पुकारून आम्ही शेतकऱ्यांची वज्रमूठ आणि ताकद सरकारला दाखवून देऊ.” रोहित पवार यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि ‘जेल भरो’च्या इशाऱ्यामुळे अखेर सरकारला नमते घ्यावे लागले असून गिरीश महाजन यांनी स्वतः फोन करून चर्चा केली. आता मुंबईत होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कर्जमाफीच्या २०१९ च्या अटी आणि ५० हजारांची मर्यादा यावर काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्यातील बळीराजाचे लक्ष लागले आहे.
या एल्गार आंदोलनात संपूर्ण मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांसह खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे साहेब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब, ज्येष्ठ नेते. मा. अनिल देशमुख साहेब, खा. निलेश लंके जी, खा. कल्याण काळे जी, खा. अमर काळे जी, खा. बजरंग सोनवणे, मा. राजेश टोपे साहेब, आ. संदिप क्षीरसागर, सलील देशमुख यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगरमधील आंदोलनस्थळी सध्या प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर बोलताना रोहित पवार यांनी सरकारला थेट आव्हान दिले, आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची आणि बळीराजाचा आवाज दाबण्याची पूर्ण तयारी सरकारने केली होती.
या एल्गार आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनीही आपली आक्रमक भूमिका मांडली. शेतीमालाचे घसरलेले दर, रखडलेली कर्जमाफी आणि इतर प्रलंबित प्रश्न शासनाने तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. या आंदोलनाला सर्वसामान्य नागरिक आणि विविध शेतकरी संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत असून, आगामी काळात हे आंदोलन राज्यामध्ये मोठे वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रोहित पवार यांनी सरकारला घेरताना फोडाफोडीच्या राजकारणावरही प्रहार केला. जे सरकार स्वतः पक्ष आणि नेते फोडून सत्तेवर आले आहे, त्यांना फक्त फोडाफोडीचेच राजकारण आवडते आणि जमते. सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी या सरकारला काहीही देणेघेणे नाही, असा टोला त्यांनी लगावला. याचसोबत त्यांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा गंभीर उल्लेख करत, या घोटाळ्यात सरकारच्या जवळच्याच व्यक्तींचा थेट संबंध असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.