
राज्यात कांदाप्रश्न ऐरणीवर आला आहे. केंद्र शासनाने दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात दोन लाख टन कांदा १२३५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य दर मिळावा, यासाठी ही खरेदी केली जाणार असल्याचा देखावा केला जात आहे. नाफेड व एनसीसीएफमार्फत होणाऱ्या या खरेदीत नेहमीचेच सोकावलेले बोके पुन्हा आपले उखळ पांढरे करून घेतील. शेतकऱ्यांकडून १२३५ रुपये दराने उत्तम दर्जाचा कांदा खरेदी केला जातो. खुल्या बाजारात भाव वाढले की, ही टोळी हा चांगला कांदा व्यापाऱ्यांना विकून टाकतात व त्या जागेवर कमी गुणवत्तेचा, आकाराचा, खराब कांदा सरकारला देतात. बऱ्याचदा कांदा प्रत्यक्ष खरेदी न करता फक्त कागदावर खरेदी दाखवतात व पैसे लाटतात. या घोटाळ्यात नाफेड, एनसीसीएफचे अधिकारी, काही पुढारी, व्यापारी, शासकीय अधिकारी व काही शेतकरीही सामील असतात, असा आरोप घनवट यांनी केला आहे. यापूर्वीच स्वस्तात खरेदी केलेला कांदा व्यापारी शेतकऱ्यांच्या नावे टाकून सरकारला १२३५ रुपये दराने विकणार.
आळेफाटा परिसरात कांदा काढणीची लगबग; दर कोसळल्यामुळे शेतकरी संकटात
शेतकऱ्यांना एक क्विंटल कांदा उत्पादित करण्यास किमान दोन हजार रुपये खर्च येतो, साठवणुकीसाठी पाच रुपये प्रतिकिलो खर्च होतो, त्याच्यावर काही नफा ठेऊन शासनाने खरेदी केली असती तर ते शेतकऱ्यांच्या हितासाठी झाले असते. मात्र, सरकार निर्यातयोग्य दर्जाचा कांदा फक्त १२३५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करणार आहे. यात शेतकऱ्यांचा कोणताही फायदा नाही.
उलट जेव्हा दर वाढतील तेव्हा हाच कांदा पुन्हा बाजारात ओतून भाव पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी सरकारला अजिबात कांदा विकू नये.