
Jayakwadi Dam Water Level: जायकवाडी ८० टक्क्यांच्या उंबरठ्यावर! (Photo Credit- X)
आवकेचा वेग कायम राहिल्यास येत्या आठवडाभरात नाथसागर पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यासाठी अत्यंत दिलासादायक बाब म्हणजे, या जलसाठ्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील सिंचन, औद्योगिक वापर आणि लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. गेल्या काही वर्षांत कमी पावसामुळे निर्माण झालेली अनिश्चितता यंदा निसर्गाने भरून काढल्याचे चित्र आहे.
सध्या धरणाच्या सांडव्यावरून कोणताही विसर्ग सुरू नसला तरी जलसाठा ९० टक्क्यांहून अधिक झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन विसर्गाबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या नाथसागरातून माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून १,१०० क्युसेक, तर डाव्या कालव्यातून सिंचनासाठी ७०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. दोन्ही कालव्यांतून एकूण १,८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
नाथसागर धरणातून सांडव्याद्वारे पाणी देण्यात आलेल्या नाहीत, धरणातील पाणीसाठा ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर तसेच वरच्या धरणांतून येणारी आवक व विसर्गाचा आढावा घेऊन परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. सध्या पाणी सोडण्याचा कोणताही प्रस्ताव अथवा आदेश नाही. – गणेश हसे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग
३१ जुलै २०२५ रोजी नाथसागर धरणातील जलसाठा ९० टक्क्यांहून अधिक झाल्यानंतर सांडव्यावरून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. यंदा मात्र १ ऑगस्ट २०२६ रोजी धरणातील जलसाठा ७९.७४ टक्के असून, सध्या सांडव्यावरून विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.
जलसाठा : ७९.७४ टक्के
पूर्ण जलपातळी १५२२.०० फूट (४६३.९०६ मी.)
सध्याची जलपातळी १५१८.०६ फूट (४६२.७०५ मी.)
जिवंत पाणीसाठा १७३१.०५८ दलघमी (६१.१२ टीएमसी)
एकूण पाणीसाठा: २४६९.१६४ दलघमी (८७.१९ टीएमसी)