
पाण्यासाठी महापालिकेने साधला गुढीपाडव्याचा मुहूर्त (Photo Credit- AI)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठ्यासंदर्भात मार्च २०२६ ची डेडलाईन दिली असून सध्या शहराच्या २७४० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार मार्च अखेरीस शहराला वाढीव २०० एमएलडी पाणी मिळेल, असा दावा केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीत अनेक त्रुटी असल्याचे समोर आले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कंत्राटदाराच्या त्रुटींवर बोट ठेवले होते. यावेळी महापालिका आयुक्तांना स्वतंत्र शपथपत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
गुरुवारी जी. श्रीकांत न्यायालयात शपथपत्र सादर करणार आहेत. या पार्शवभूमीवर मंगळवारी त्यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असले तरी ज्याठिकाणी पाइपलाइन खालीवर आहे तिथे स्लॅब टाकून ती झाकली जात आहे. आणखी दोन-तीन ठिकाणी ही कामे सुरूच आहेत.
जी. श्रीकांत यांनी शिल्लक कामे व ती पूर्ण करण्यासाठी लागणार कालावधी याचा तक्ता सादर करण्याचे आदेश दिले. जीव्हीपीआर कंपनीतर्फे सुरू असलेल्या तसेच इलेक्ट्रिकच्या कामांसाठी आणखी १५ दिवसांचा वेळ लागेल, असे सांगण्यात आले. त्यानुसार न्यायालयात शपथपत्र सादर केले जाणार आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर पंप सुरू होऊ शकतात, असे जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले.
पंप सुरू केल्यानंतर पाइपलाइनची स्वच्छता कशी करणार? यावरून यावेळी विचार विमर्श करण्यात आला. नव्या पंपाव्दारे पाच-पाच किलोमीटर अंतराची पाइपलाइन स्वच्छ केली जाईल. जागोजागी सोडण्यात आलेल्या वॉल्व्हव्दारे मातीसह पाइपलाइनमध्ये असलेले साहित्य बाहेर काढले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी किमान एक महिन्याचा वेळ लागणार आहे. त्यामुळे पाडव्याला पंप सुरू केले जाणार असले तरी पाण्यासाठी शहरवासीयांना वाट पाहावी लागणर आहे.