
फोटो सौजन्य - Social Media
सामाजिक बांधिलकी जपत संत निरंकारी मिशन तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मानव एकता दिनानिमित्त सिंधी कॉलनीतील सत्संग भवन येथे पार पडलेल्या या शिबिरात तब्बल ४५५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून मानवतेच्या कार्यात मोलाचा हातभार लावला. विशेष म्हणजे या शिबिरात ४२० पुरुष आणि ३५ महिलांनी रक्तदान केले.
या उपक्रमाचे उद्घाटन माजी विभागीय प्रमुख कन्हैयालाल डेबरा, जिल्हा संयोजक डी. जी. दळवी, क्षेत्रीय सेवादल प्रमुख विजय बोडखे आणि अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शासकीय रुग्णालयाच्या विभागीय रक्तसंकलन केंद्राचे डॉ. भारतकुमार सोनवणे यांचीही उपस्थिती लाभली. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराला औपचारिक सुरुवात झाली.
या प्रसंगी बोलताना कन्हैयालाल डेबरा यांनी सांगितले की, संत निरंकारी मिशनकडून समाजोपयोगी विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. त्यामध्ये रक्तदान शिबिराचा विशेष समावेश असून वर्षातून किमान दोन वेळा अशा शिबिरांचे आयोजन केले जाते. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून मानवतेच्या यज्ञात प्रत्येकाने आपला वाटा उचलावा,” असे आवाहन त्यांनी केले.
सकाळपासून सुरू झालेल्या या शिबिरात अवघ्या आठ तासांत ४५५ जणांनी रक्तदान केले. मात्र काही वैद्यकीय कारणांमुळे २६ पुरुष आणि ५४ महिलांना रक्तदान करता आले नाही. तरीही मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतल्यामुळे शिबिर यशस्वी ठरले. रक्तदात्यांच्या सोयीसाठी नाश्ता आणि ज्यूसची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुमारे २०० सेवादल सदस्यांनी परिश्रम घेतले. निरंकारी मंडळात एकूण २५० महिला-पुरुष सेवादल सदस्य कार्यरत असून त्यांनी शिस्तबद्ध आणि समन्वयाने संपूर्ण कार्यक्रम पार पाडला. शिबिरादरम्यान आरोग्य नियमांचे पालन करत रक्तसंकलन प्रक्रिया सुरक्षितरीत्या पार पडली.
या उपक्रमातून समाजात रक्तदानाबाबत जागरूकता वाढवण्यास मोठी मदत झाली असून, नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संत निरंकारी मिशनच्या सामाजिक कार्याला आणखी बळ मिळाले आहे. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे समाजसेवेचा ध्यास कायम ठेवणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.