
महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वीपासून सुरू असलेले चिकलठाणा, जाफरगेट आणि पीर (सोमवार) आठवडी बाजार शहराच्या वाढत्या गरजांमुळे आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाजारांमुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होऊन अपघातांची शक्यता वाढत असल्याचे प्रशासनाचे निरीक्षण आहे.
सध्या या आठवडी बाजारांमध्ये दर आठवड्याला अंदाजे २५ ते ५० लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे. शेतकरी आणि फिरते विक्रेते थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांना स्वस्त दरात ताजा भाजीपाला उपलब्ध होत होता. मात्र, हीच व्यवस्था आता नियोजित भाजीमंडईत स्थलांतरित केली जाणार आहे.
याशिवाय, बाजार संपल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील चिकलठाणा, जाफरगेट आणि शहानुरमिया दर्गा परिसरातील आठवडी बाजार बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्प सादरीकरणावेळी ही भूमिका स्पष्ट केली.
आठवडी बाजार बंद केल्यानंतर नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने पर्यायी योजना आखली आहे. शहरातील विविध भागांत उभारण्यात आलेल्या भाजीमंडईतील गाळ्यांमध्येच भाजीपाला व इतर कृषी उत्पादने विक्रीस परवानगी दिली जाणार आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर भरवले जाणारे आठवडी बाजार वाहतुकीस मोठा अडथळा ठरत होते. गर्दीमुळे किरकोळ अपघात होत होते. याशिवाय, बाजार संपल्यानंतर उरलेला कचरा व अस्वच्छता नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होती. या पार्श्वभूमीवर नियोजित व स्वच्छ बाजारपेठ निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयुक्तांनी स्पष्ट केले की, यापुढे रस्त्यावर किंवा दुभाजकांवर कोणत्याही प्रकारचा आठवडी बाजार किवा अनधिकृत व्यवसाय करण्यास संपूर्ण बंदी राहील, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.