
संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! १५ दिवसांत नव्या दोन्ही जलवाहिन्या होणार सुरू
नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे पाणी साठवून शहराला दररोज २० ते २५ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. नक्षत्रवाडीहून शहराकडे टाकण्यात आलेल्या तीन प्रमुख जलवाहिन्यांपैकी १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर अंतिम चाचण्या सुरू आहेत. या मार्गावरील एन-५ आणि एन-७परिसरातील जलकुंभांना क्रॉस कनेक्शन देण्यात आले असून एअर व्हॉल्व्हची तपासणी पूर्ण झाल्यानंतर हसूल-जटवाडा भागाला या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू होईल. त्यामुळे शहरातील नागरिकांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.
सुमारे १७ किलोमीटर अंतरावरील जलकुंभांमार्फत हा पुरवठा करण्यात येणार आहे. यानंतर २००० मिमी व्यासाची जलवाहिनीही कार्यान्वित केली जाणार आहे. या जलवाहिनीशी जोडलेल्या नव्याने उभारलेल्या पाच जलकुंभांसह महापालिकेच्या विद्यमान जलकुंभांद्वारे शहरातील विविध भागांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
जायकवाडी धरणातून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी प्रस्तावित अॅप्रोच चॅनलच्या कामालाही गती मिळाली आहे. संबंधित कंत्राटदार कंपनीने कामासाठी आवश्यक मार्किंग पूर्ण केले असून लवकरच प्रत्यक्ष खोदकाम सुरू होणार आहे. धरणातील पाणीपातळी ४४८ मीटरपर्यंत खाली गेली तरी पाणी उपसा करता यावा, यासाठी अॅप्रोच चॅनलची रचना करण्यात येत आहे. या कामामुळे भविष्यात दुष्काळी परिस्थितीतही मृतजलसाठ्यातून पाणी उपलब्ध करून घेणे शक्य होणार असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहराला दररोज २०० एमएलडी पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून ४० एमएलडी पाणी घेतले जात असून त्यापैकी २० ते २५ एमएलडी पाणी प्रक्रिया करून शहरात वितरित केले जात आहे. उर्वरित जलवाहिन्या सुरू झाल्यानंतर पुरवठ्याची क्षमता आणि वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.