
दुधातील भेसळीवर मुंढेंचा बुलडोझर? राज्यव्यापी कठोर कारवाई मोहीम हाती घेण्याची मागणी
बारामती/अमोल तोरणे : राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या दुधातील भेसळीच्या घटनांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या गंभीर प्रकाराला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तातडीने राज्यव्यापी कठोर कारवाई मोहीम हाती घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. दुधात युरिया, डिटर्जंट, स्टार्च, कृत्रिम फॅट, हायड्रोजन पेरॉक्साइड यांसारख्या घातक रसायनांची भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भेसळ माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची वेळ आली असल्याची भावना व्यक्त होत आहे.
राज्यातील सर्व दूध संकलन केंद्रे, चिलिंग प्लांट, खासगी डेअरी आणि दूध विक्री केंद्रांवर अचानक धाडी टाकून नमुने तपासण्याची व्यापक मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात विशेष दूध भेसळ प्रतिबंधक पथके स्थापन करून सातत्याने तपासणी करण्यात यावी. दोषी आढळणाऱ्या डेअरी व विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने तात्काळ रद्द करावेत, अशीही मागणी पुढे आली आहे.
“भेसळमुक्त दूध, सुरक्षित महाराष्ट्र” अभियान प्रभावीपणे राबवावे
दुधातील भेसळ हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून लाखो नागरिकांच्या आरोग्याशी आणि भावी पिढीच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीनुसार राज्यभर विशेष मोहीम उघडून “भेसळमुक्त दूध, सुरक्षित महाराष्ट्र” हे अभियान प्रभावीपणे राबवावे, अशी जनतेकडून अपेक्षा व्यक्त आहे.
चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत चर्चा
राज्यातील चित्रपट, मालिका आणि वेब मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवर कलाकार, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात भेट घेतली. तुकाराम मुंढे यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत पुढील आठवड्यात आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले जातील, असे सांगितले. कलाकार व तंत्रज्ञांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, निर्माते नितीन धावणे, अभिनेत्री अपेक्षा चव्हाण, अभिनेते मिलिंद दास्ताने, सुनील पगार, दिग्दर्शक शरीश राणे, निर्माते चंद्रकांत विसपुते आणि वितरक अजय फुटाणे यांचा समावेश होता.