विदर्भात काँग्रेसला उभारी मिळणार; 'या' नेत्यांना दिली गेली महत्त्वपूर्ण जबाबदारी (संग्रहित फोटो)
मुंबई : महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकांनी दिलेल्या मतदानावर आलेले नाही तर निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन आलेले सरकार आहे. मतचोरी कशी केली याचे पुरावे काँग्रेस पक्षाने आयोगाला देऊनही त्यावर काहीच कारवाई होत नाही. काँग्रेस पक्षाने घेतलेले आक्षेप योग्यच आहेत हे आयोग पुन्हा पुन्हा सिद्ध करत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे परिपत्रक निवडणूक आयोगाने काढले आहे आणि हे परिपत्रक म्हणजेच मतचोरी केल्याचा आणखी एका पुरावा आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, निवडणूक आयोगाची चोरी पुन्हा पकडली आहे. आपण अपराधी आहोत, चोरी करत आहोत याचा पुरावा ते देत आहेत. महाराष्ट्रात चोरी पकडली गेली आहे. मतचोरीचे पुरावे लपवण्यासाठी आयोगाने कायद्यातही बदल केले. चंदिगड उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही आयोगाने सीसीटीव्ही फुटेज, मशिन रिडेबल व्होटर लिस्ट संदर्भातील कायदा बदलला. आता महाराष्ट्रातील निवडणुकीचे रेकॉर्ड नष्ट करण्यासाठी एक परिपत्रक काढले आहे. लोकांनी दिलेल्या मतदानावर हे सरकार आलेले नाही तर चोरीचे सरकार महाराष्ट्र व हरियाणात आणलेले आहे, हे या परिपत्रकावरून स्पष्ट होते. आता बिहारमध्ये चोरीचा वेगळा प्रकार सुरु केला आहे, यांना आम्ही सोडणार नाही. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले सरकार आले पाहिजे, मतदानाची चोरी केलेले सरकार संविधान संमत असू शकत नाही असेही अतुल लोंढे म्हणाले.
हे सुद्धा वाचा : घरफोड्यांपुढे पोलीस हतबल! एकाच दिवशी सहा ठिकाणी चोरी; लाखोंचा मुद्देमाल लंपास
राहुल गांधींचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात गेल्या 5 महिन्यात 8 टक्के मतदार वाढले असा आरोप कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी मोठा आरोप केला आहे. काही बूथवर 20 ते 50 टक्के मतदार वाढले असा आरोपही राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला आहे. यावर निवडणूक आयोग मौन बाळगून का आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचा दाखला देत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.