
स्वाभिमान गहाण टाकलेल्या उबाठाला काँग्रेसने जागा दाखवली, ज्योती वाघमारे यांची घणाघाती टीका (फोटो सौजन्य-X)
मुंबई : इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसणाऱ्या उबाठांनी स्वाभिमान गहाण टाकला, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या डॉ. प्रा. ज्योती वाघमारे यांनी आज केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महाराष्ट्रात असताना दिल्लीसमोर झुकणार नाही, अशी भाषा करणारे उबाठा दिल्लीत सोनिया आणि राहुल गांधींसमोर मुजरा करायला गेले होते का, असा खरमरीत सवाल वाघमारे यांनी यावेळी केला.
डॉ. वाघमारे पुढे म्हणाल्या की, उबाठा, आदित्य ठाकरे आणि सकाळचा भोंगा यांना इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत स्थान देण्यात आले होते. यावरुन डॉ. वाघमारे यांनी उबाठावर सडकून टीका केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मणीशंकर अय्यर यांना हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जोडे मारले होते. मात्र आज उबाठा, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत तीन दिवस दिल्लीत काँग्रेसवाल्यांचे बुट चाटायला गेलेत का, अशी टीका डॉ. वाघमारे यांनी केली. नाना पाटेकरांचे सिनेमा पाहण्यापेक्षा बाळासाहेबांची भाषणे ऐकली असती तर आज उबाठावर काँग्रेस नेत्यांसमोर झुकण्याची वेळ आली नसती, असे त्या म्हणाल्या.
सोनिया आणि राहुल गांधींसमोर हिरवा आतंकवाद म्हणण्याचे धाडस उबाठाने का दाखवले नाही. काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद, सनातनी आतंकवाद म्हटले तेव्हा निषेध करण्यासाठी उबाठावाले कुठल्या बिळात लपले होते. बाळासाहेबांनी मॅड हिंदू असल्याचे जाहीरपणे सांगितले होते, मात्र ती हिंमत उबाठा दाखवतील का, असा सवाल डॉ. वाघमारे यांनी केला. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या घरी जाऊन तुम्ही ब्रॅंड नाही तर बाळासाहेबांच्या विचारांचा बॅंड वाजवला, अशी खोचक टीका डॉ. वाघमारे यांनी उबाठावर केली. स्वाभिमान गहाण ठेवून राहुल गांधीसमोर झुकणारे उबाठा हे लाचारपुत्र आहेत तर बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे विचारपुत्र आहेत, असे डॉ. वाघमारे म्हणाल्या.