
'सुषमा अंधारेंनी कठीण काळात पक्षाची साथ दिली, पण...'; सचिन अहिरांचे वक्तव्य चर्चेत, सुषमा अंधारे शिंदेंच्या सेनेत जाणार?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि बाबाजी काळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दोन्ही नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करत पक्षातील निर्णयप्रक्रियेवरही अप्रत्यक्ष भाष्य केले.
बाबाजी काळे आणि सुषमा अंधारे भविष्यात शिंदे गटात येणार का, असा प्रश्न विचारला असता सचिन अहिर म्हणाले, “बाबाजी काळे यांनी दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाला भरभरून दिले आहे. त्यांनी २० आमदारांपैकी सर्वाधिक ५२ हजारांचे लीड मिळवून दिले. त्यामध्ये त्यांचे स्वतःचे कौशल्य होते, तर पक्षाने जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून त्यांना साथही दिली. पुढे काय करायचे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल.”
सचिन अहिर यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांबाबतही भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “सत्ता असतानाही माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांना अपेक्षित संधी देता आली नाही, अशी भावना त्यांच्या मनात आहे. कोविड काळामुळे महामंडळांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि याचे शल्य आजही आहे.”
सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना सचिन अहिर यांनी २०२२ मधील सत्तांतराच्या काळातील एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “महाविकास आघाडी सरकार पडत असताना दुसऱ्याच दिवशी सुषमा अंधारे यांचा मला फोन आला. तिसऱ्या दिवशी मी त्यांना मातोश्रीवर घेऊन गेलो. त्यावेळी त्यांनी ‘मला काही नको, पण अशा कठीण प्रसंगी मी पक्षासोबत उभी राहीन,’ असे सांगितले होते.”
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार का? दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, ‘पक्षाचे…’
अहिर पुढे म्हणाले, “सुषमा अंधारेंनी पक्षासाठी १०० हून अधिक सभा घेतल्या. त्या अत्यंत डॅशिंग प्रवक्त्या आहेत. त्यांनी अनेक मुद्दे आक्रमकपणे मांडले, भ्रष्टाचाराचे विषय उचलून धरले. मात्र, पक्षाने त्यांच्या नावाचा पुरेसा विचारच केला नाही, ही खंत आहे.” सचिन अहिर यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत राजकारण आणि पक्षातील नेतृत्वाच्या निर्णयांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.