
५६ इंचाच्या छातीचा व्यक्ती अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर, पण...; हर्षवर्धन सपकाळांची टीका
त्र्यंबकेश्वर : काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या कार्यशाळेतून वर्षभरातील पक्ष संघटनेचे कामाकाजाची रुपरेषा ठवरून त्यामार्गाने मार्गक्रमण करण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकारविरोधात लढणे, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच काँग्रेसचा विचार अधिक लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी या कार्यशाळेत मंथन केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीसाठी त्र्यंबकेश्वर येथील श्रीचंद लॉन्स येथे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड गणेश पाटील, शरद आहेर, अॅड. सचिन नाईक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस गुरबचन बच्छर, राजाराम पानगव्हाणे, प्रभारी ब्रिज दत्त, श्रुती म्हात्रे, नाशिक जिल्हा (उत्तर) काँग्रेसचे अध्यक्ष भारत टाकेकर, नाशिक दक्षिण जे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडाळ, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अक्षय छाजेड, प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के आदी उपस्थित होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, २०१४ पासून एक ५६ इंचाच्या छातीचा व्यक्ती अच्छे दिन चे स्वप्न दाखवून सत्तेवर आला पण विकासाचे दाखवलेले स्वप्न फुसका बार ठरला. भाजपा खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने राज्य कारभार करत आहे, ही हुकूमशाही संपुष्टात आणली पाहिजे. सरकार हे लोकशाही व संविधानानुसार चालला पाहिजे, काँग्रेस पक्षाने याच मुल्याने कारभार केला. आज लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. भाजपाच्या सत्ता, संपत्ती व अहंकाराच्या बुलडोझर समोर काँग्रेसचा कार्यकर्ता निर्धाराने लढला. सरकारी यंत्रणा व पैशाचा वारेमाप वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा लढला. इंग्रजाविरोधात स्वातंत्र्य सैनिक लढले त्याच त्वेषाने काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता लढला. जे यश मिळाले ते वाखण्याजोगे आहे. हा लढा असाच पुढे सुरु ठेवायचा आहे आणि पक्षासाठी कटीबद्ध होवून संघटनेसाठी काम करा, पक्षाला गतवैभव नक्की प्राप्त होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
यावेळी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, देशात दोन विचारांची लढाई सुरु आहे, संविधानवादी व मनुवादी असा हा संघर्ष असून भाजपाला संविधान मान्य नाही. १९८९ पासून भाजापाने धर्मांधतेचे राजकारण सुरु केले आहे पण मनुवादाविरोधातील हा लढा हजारो वर्षापासूनचा आहे. काँग्रेसचा विचार हा सर्वसामान्य जनतेला अधिकार व हक्क देणारा आहे तोच विचार लोकशाही व संविधानात आहे. संविधानाने सर्वांना हक्क व अधिकार दिले आणि भाजपाचा विचार हा नेमका याविरोधातला आहे. भाजपा संविधानावर आक्रमण का करत आहे हे यातून समजून घ्या, असे सचिन सावंत म्हणाले.
दुपारच्या सत्रात ज्येष्ठ नेते व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी यावेळी शिबिर कशासाठी आहे व त्याचा पदाधिका-यांना काय फायदा होईल हे सांगून जनतेशी संवाद साधा असे आवाहन केले. शुक्रवारी शिबिराच्या सांगता समारोहातही बाळासाहेब थोरात मार्गदर्शन करणार आहेत.