
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजप अन् RSSचे राष्ट्रीय धोरण, त्यांना...; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप
मुंबई : भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा अशास्त्री बरळला तरीही त्यावर या तिघा नेत्यांनी साधा निषेधही नोंदवला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजपा आरएसएसचे राष्ट्रीय धोरण असून महाराजांचे विचार व कर्तृत्व त्यांना मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही, महाराजांचा अपमान केल्याबद्दल धिरेंद्र शास्त्री, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी व मोहन भागवत यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा, आरएसएस व धिरेंद्र शास्त्रीचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत, त्यांच्या विचारांनी देशाला व महाराष्ट्राला दिशा दिली आहे. हिंदवी स्वराज्याचे विचारच संविधानातही आहेत. हाच विचार व छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व भाजपा व रा. स्व. संघाला मान्य नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची सातत्याने बदनामी करणे, त्यांचा अपमान करणे व महाराजांच्या इतिहासाची विकृत मांडणी करणे हे भाजपा व रा. स्व. संघाचे राष्ट्रीय धोरण आहे. काळी टोपीवाला भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, छिंदम, या भाजपाच्या पिलावळीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गरळ ओकली पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही. तर जय भगवान गोयल या भाजपा नेत्याने ‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’, नावाचे पुस्तक लिहून महाराज व मोदींची तुलना केलेली आहे, याचा संताप जनतेमध्ये आहे.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक लिखाण आहे. सावरकर यांनीही ‘सात सोनेरी पाने’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्लदल घाणेरडे व विकृत लिखाण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भूषण आहेत त्यांच्याबद्दल भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्री अपमानकारक बोलत असताना फडणवीस, गडकरी व मोहन भागवत यांना लाज वाटायला हवी होती, त्यांनी त्याला थांबवले पाहिजे होते. राज्यभरात या विरोधात तीव्र संताप आहे. शिवाजी महाराजांबद्दल अशी अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करत नसल्यान चुकीचा संदेश जात आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.