
काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो; भाजपाने मात्र...; हर्षवर्धन सपकाळांची टीका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वसमत, भोकर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतल्या. यावेळी खासदार रवींद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील, नांदेड शहराध्यक्ष अब्दुल सत्तार अब्दुल गफूर, सुरेंद्र घोडसकर, तिरुपती पाटील कोंढेकर, सुरेश दादा गायकवाड, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बालाजी गाडे, भारतीताई पवार, रेखाताई चव्हान, तौसिफ इनामदार, आदिनाथ चिंताकुटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशाच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान आहे ते कोणीही नाकारू शकत नाही. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंत विकासाची शिखरे काँग्रेस सरकारने गाठली. पण २०१४ पासून सत्तेत आलेल्या भाजपाने काय दिले, तर फक्त खोटी आश्वासने दिली. नोटबंदी केली पण काळा पैसा बाहेर आला नाही, अतिरेकी कारवाया थांबल्या नाहीत फक्त सर्वसामान्य जनतेला त्रास झाला. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांचे उत्तपन्न दुप्पट करणार हे सर्व हवेतच विरून गेले. नरेंद्र मोदींच्या राजवटीत अदानी व अंबानी तुपाशी आणि जनता मात्र उपाशी अशी परिस्थिती आहे.
काँग्रेस पक्षाने भोकरला खूप काही दिले. आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण भोकरला आल्यावर मात्र… नाम बडे और दर्शन खोटे, अशी परिस्थिती होती, अशा लोकांचा इतिहास विसरू नका. भोकरचे ते डरपोक लोक मोदींच्या कळपात जाऊन बसले, ‘जो डर गया ओ मर गया’, त्यांनी गद्दारी केली, पळून गेले आता शेठ, सावकारांचे राज्य नको, जनतेचे राज्य हवे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जाणते नेतृत्व आहेत, त्यांनी राज्याच्या विकासासाठी, समाजकारणासाठी आपली हयात खर्ची घातली, वैचारिक मतभेद असू शकतात पण आज सत्ताधारी पक्ष त्यांना त्रास देत आहे, ते अशोभनीय आहे. शरद पवार यांचा पक्ष फोडला, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला. पूर्वी पोरं चोरणारी टोळी होती आता भाजपा हा पक्ष फोडणारी टोळी बनली आहे, याचा धिक्कार करतो असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.