
Maharashtra Politics : हे 'ऑपरेशन टायगर' नसून 'ऑपरेशन गिधाड'; काँग्रेस नेते नाना पटोलेंचा टोला
मुंबई : राज्यातील सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदार सुरक्षेच्या नावाखाली मोठमोठे ताफे घेऊन फिरत आहेत. सरकारी व्यवस्थेची आणि जनतेच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी सुरू आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या संस्था आणि व्यवस्था विक्रीच्या मार्गावर नेल्या गेल्या असून, सर्व राज्यांवर ताबा मिळवण्याचे राजकारण सुरू आहे. पश्चिम बंगाल निवडणुका जिंकल्यानंतर भाजपने देशाचा नकाशा जाहीर करून किती राज्यांमध्ये सत्ता मिळवली याची जाहिरात केली. स्वतःच्याच हाताने स्वतःची पाठ थोपटण्याचे काम भाजप सरकारने केले आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपा मंत्र्यांकडूनच बगल दिली जात आहे. स्वतः ऐशोआरामात राहून जनतेला काटकसरची आवाहन केले जात आहे, अशीही टीका यावेळी पटोले यांनी केली.
नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजप सरकारमधील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि स्वतः पंतप्रधान कसे वागतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. माजी केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांनी अशाच कठीण परिस्थितीत स्वतःपासून काटकसरीची सुरुवात केली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांनीही स्वतः उदाहरण घालून दिले होते. त्यांनी देशासाठी आदर्श आणि मार्गदर्शक अशी व्यवस्था निर्माण केली. मात्र, भाजप सरकारकडून अशा प्रकारच्या जबाबदार भूमिकेची अपेक्षा कुणालाही वाटत नाही.
भाजप तेरा वर्षे सत्तेत असतानाही देशाची जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती लपवण्यासाठी वेगवेगळे विषय पुढे आणले जात आहेत. तत्कालीन परिस्थितीत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता. माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी हरितक्रांती आणि श्वेतक्रांती घडवून आणत देशाला स्वयंपूर्ण बनवले. या ऐतिहासिक गोष्टींचा उल्लेख भाजपनेही करायला हवा. आज देश अमेरिकेच्या दबावाखाली काम करत असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे. भारताने यापूर्वी कधीही कोणत्याही देशासमोर शरणागती पत्करलेली नव्हती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची स्वायत्तता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे. देशाला अमेरिकेसमोर गहाण ठेवण्याचे काम झाले आहे.
राहुलजी गांधी यांनी याबाबत अनेकदा भूमिका मांडली आहे. मी स्वतः यासंदर्भात पत्रव्यवहार केला असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही यावर टीका केली आहे. याचा अर्थ देशाची परिस्थिती धोकादायक बनत चालली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत असुरक्षित होत चालला असून, सामान्य जनतेसमोर अन्नधान्य आणि दैनंदिन गरजांबाबत गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. देशावर संकट आलेल्या काळात काँग्रेसने नेहमी सर्वपक्षीय भूमिका घेतली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही परदेश दौऱ्यावर प्रतिनिधित्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आज देशाचे पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकींना अनुपस्थित राहतात. त्यामुळे शरद पवार यांनी दिलेला सल्ला योग्य असल्याचे स्पष्ट होते असेही नाना पटोले म्हणाले.
हे सुद्धा वाचा : रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये आढळली बॉम्बसदृश वस्तू; हडपसर परिसरात एकच खळबळ