
समृद्धीवर 'ब्रेकडाउन' वाहनांना लगाम! अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई; आरटीओचा इशारा
समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर रस्त्यात उभे असलेले वाहन म्हणजे मोठ्या अपघाताला निमंत्रणच ! त्यामुळे महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध परिवहन विभागाने आता कठोर कारवाईची भूमिका घेतली. वाहन बंद पडल्यास अथवा कोणत्याही कारणास्तव थांबावे लागल्यास वाहन तात्काळ सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. समृद्धी महामार्गाच्या नोडल अधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी वाहनधारक आणि वाहनचालकांना याबाबत विशेष सूचना दिल्या आहेत. महामार्गावर वाहनांचा वेग मोठा असल्याने मुख्य मार्गावर किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी वाहन उभे करणे अत्यंत धोकादायक आहे. अशा वाहनांमुळे मागून येणाऱ्या वाहनांना वेळेत अंदाज न आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि अपघातमुक्त ठेवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नियमित तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणीदरम्यान चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली वाहने आढळल्यास ती तात्काळ सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. वाहनात बिघाड झाल्यास चालकांनी शक्य तितक्या लवकर वाहन सुरक्षितस्थळी हलवावे आणि संबंधित यंत्रणेला त्याची माहिती द्यावी, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर यांनी दिली.
पालनः रस्ते सुरक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटिशन क्रमांक ०९/२०२५ मध्ये १३ एप्रिल २०२५ च्या अंतरिम निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांच्या अनुषंगाने सार्वजनिक रस्ते आणि महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने पार्क करू नयेत, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. समृद्धी महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर यापुढेही कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल”, असा इशारा समृद्धी महामार्गाच्या नोडल अधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिला.
नदी पोखरणारे रेतीमाफिया आता रडारवर! रॉयल्टीच्या दहापट दंडाची कारवाई; अवैध उत्खननाला शासनाचा दणका
वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर याच प्रकारची घटना समोर आली. रविवारी एचआर / ५५ बीए ८५४४ क्रमांकाच्या कंटेनरचालकाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये नागपूरहून पुण्याला नेण्यात येणारा माल असल्याचे आढळून आले. वाहन राष्ट्रीय महामार्गाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच चालकाविरुद्ध सावंगी, जिल्हा वर्धा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.