
परतवाडा महामार्गाचे चौपदरीकरण करा! अरुंद रस्ता, वाढती वर्दळ आणि वाढत्या अपघातांचा धोका कायम
अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या अमरावती-परतवाडा महामार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढत आहे. रस्ता अरुंद पडत असल्याने या महामार्गाचे तातडीने चौपदरीकरण करून वाहतूक सुरक्षित व सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. जिल्ह्यातील अध्यपिक्षा अधिक वाहतुकीचा भार झेलणारा आणि सर्वाधिक वर्दळीचा मार्ग म्हणून अमरावती-परतवाडा मुख्य रस्त्याची ओळख आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख रस्त्यांचे चौपदरीकरण झाले असताना, अमरावती-परतवाडा मार्ग मात्र अद्याप विकासापासून कोसो दूर असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.(फोटो सौजन्य – AI)
वाढत्या वाहतूक भाराच्या तुलनेत हा रस्ता अरुंद पडत असून, अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने या महामार्गाचे तातडीने चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर आहे. अमरावती परतवाडा मार्गावरून दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, चिखलदरा, धारणी तसेच धारणी मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या वाहनांची दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मार्गावरून प्रवासी वाहतूक, मालवाहतूक तसेच खासगी वाहनांची सतत ये-जा सुरू असते. मेळघाट व मध्यप्रदेशाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्याचे वाहतुकीच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. या महामार्गावर वलगाव, आसेगाव आणि पूर्णा नगर यांसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये स्थानिक वाहतूक, पादचारी, दुचाकीस्वार तसेच प्रवासी वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, वाढत्या वाहनसंख्येच्या तुलनेत रस्त्याची रुंदी अपुरी पडत असल्याने वाहनचालकांना अनेकदा धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करावे लागते. परिणामी, अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या मार्गावर वारंवार होणारे अपघात अनेक कुटुंबांसाठी वेदनादायी ठरत आहेत.
या महत्त्वपूर्ण मार्गाची वाहतूक क्षमता, अपघातप्रवण ठिकाणे आणि भविष्यातील वाहनवाढ लक्षात घेऊन शासनाने तातडीने सर्वेक्षण करावे. आवश्यक निधी मंजूर करून चौपदरीकरणाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी प्रवासी, वाहनचालक, व्यापारी, स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
अपघातात एखादा जीव गमावल्यास त्याची भरपाई कोणत्याही विकासकामातून होऊ शकत नाही. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित कुटुंबावर आर्थिक व मानसिक संकट कोसळते. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी रस्त्याच्या विकासाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना ब्रिटिशकालीन वृक्ष मोठ्या प्रमाणात असून, त्यापैकी काही वृक्ष जीर्ण व धोकादायक झाले आहे.