
Despite having substantial water reserves and dams Hingoli has water scarcity problem
Hingoli News : हिंगोली : यंदा पावसाळ्यात विक्रमी पाऊस होऊनही हिंगोली जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईची (water scarcity) तीव्रता जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात जल जीवन मिशनची अनेक कामे रखडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तर शहरी भागात नगरपालिका व नगरपंचायतींच्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Hingoli News)
जिल्ह्यात येलदरी, सिद्धेश्वर आणि इसापूर अशी मोठी धरणे असतानाही अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. धरणे जवळ असूनही औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यातील काही गावांना या धरणांचा लाभ मिळत नसल्याने ग्रामस्थांना वर्षानुवर्षे गढूळ पाण्यावर समाधान मानावे लागत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे धरण उशाशी आणि घसा कोरडा अशी अवस्था निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा : नांदेड भाजपात ‘गटबाजीचा स्फोट’? पदनियुक्तीत निष्ठावंतांना डावलल्याची खदखद सुरूच
पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
दरम्यान, हिंगोली, सेनगाव आणि वसमत या शहरांना सिद्धेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र संबंधित नगरपालिका व नगरपंचायतींकडून पाणीपट्टीची संपूर्ण वसुली होऊनही ती रक्कम शासनाकडे जमा न केल्याने पाटबंधारे विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. थकबाकी तत्काळ न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली नगरपालिका २ कोटी ७४ लाख रुपये, वसमत नगरपालिका १ कोटी ५ लाख रुपये, सेनगाव नगरपंचायत ३१ लाख ८१ हजार
रुपये अशी थकबाकी राहिली आहे. तसेच कळमनुरी शहराला इसापूर धरणातून पाणीपुरवठा होत असला तरी तेथेही नियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम आहे. हिंगोल शहरात काही भागांत आठ-आठ दिवस पाण येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
हे देखील वाचा : बारामतीत वीजपुरवठ्यावरून युगेंद्र पवार आक्रमक; सायंकाळी फोर्स लोडशेडिंग थांबवण्याची मागणी
ग्रामीण भागात ‘घागर मोर्चा
ग्रामीण भागात हर घर जल योजनेअंतर्गत जल जीवन मिशन राबविण्यात येत असले तरी निधीअभावी व तांत्रिक अडचणीमुळे अनेक कामे अपूर्ण आहेत. परिणामी नागरिकाना पाण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली तालुक्यातील जयपूर येथील महिलांनी डोक्यावर घागरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला, पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चादरम्यान महिलांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आपल्या व्यथा मांडल्या. दररोजच्या पाणीटंचाईमुळे घरगुती कामे, शेती व जनावरांच्या देखभालीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वेळा टँकरची मागणी करूनही पुरेशी व्यवस्था होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. एकूणच, उन्हाळ्याची सुरुवात होत असतानाच जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर होत चालला असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.