
फोटो सौजन्य - Social Media
म्हसवड, महेश कांबळे : राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हसवड शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी अमृत २.० अंतर्गत सुमारे ८० कोटींचा निधी म्हसवड पालिकेला उपलब्ध करुन दिला आहे, मात्र आज ही म्हसवडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी १० ते १२ दिवसांची प्रतिक्षा करावी लागत आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असले तरी योजनेच्या जलवाहिनीला वारंवार होणारी गळती हेच मुख्य कारण पाणी विलंबाचे असुन या योजनेचा पालिकेचे पाणी पुरवठा सभापती युवराज सूर्यवंशी यांच्या सोबत घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुमच्यासमोर घेवुन आलो आहोत.
म्हसवड शहरासाठी जिवन प्राधिकरणाची वाढीव पाणी पुरवठा योजना आहे मात्र सदरची योजना कार्यान्वित होवुन ती यंदाच्या वर्षी कालबाह्य ही झाली आहे, सदर ची योजना कार्यान्वित करताना ती शहराच्या त्यावेळच्या परिस्थितीनुसार बनवलेल्या आराखड्यावर तयार करण्यात आली असली तरी सदर ची योजना पालिकेच्या ताब्यात येवुन जवळपास २५ वर्ष लोटली आहेत, या २५ वर्षात शहरातील वाढती लोकसंख्या वाढती नागरी वसाहत यामुळे सदर ची योजना शहरासाठी कमी पडु लागली आहे, अशातच सदर योजनेसाठी ही शेजारील माळशिरस तालुक्यातुन सुमारे २८ कि.मी. अंतरावरुन पाणी आणण्यात आले असुन ते माण तालुक्यातील कारखेल गावच्या परिसरात आणुन तेथुन ते जलशुध्दीकरण करुन शहरातील विविध भागातील पाण्याच्या टाक्यांमध्ये सायपन पध्दतीने सोडले जात आहे. मात्र या योजनेच्या साठवण तलाव ते जलशुध्दीकरण केंद्र या दरम्यानचे अंतर हे १२ कि.मी. अंतर असुन याठिकाणी सदर योजनेचे पाणी हे जलवाहिनीद्वारे आणले जात आहे, ही जलवाहिनी सुध्दा जीर्ण झाली असुन अनेक ठिकाणी तिला गळती लागली आहे. जलवहिनी जीर्ण झाल्याने ती वारंवार फुटत आहे त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होत आहे. ही बाब जेव्हा राज्याचे ग्राम विकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी म्हसवडकर जनतेची पाण्याची ओरड कायमस्वरुपी थांबवण्यासाठी राज्य शासनाच्या अमृत २.० योजनेंतर्गत सदर योजनेसाठी सुमारे ८० कोटींचा निधी म्हसवड पालिकेला उपलब्ध करुन दिला आहे. सदर चा निधी प्राप्त झाल्याने पालिकेनेही सदर योजनेच्या डागडुजीचे काम हाती घेत प्रत्यक्ष कामाला सुमारे अडीच वर्षापुर्वीच सुरुवात केली आहे.
मात्र ही सुरुवात करीत असताना पालिका प्रशासनाने ठेकेदारांवर आपली जरब न ठेवल्याने ठेकेदारांनी या कामी दिरंगाई तर केलीच आहे, याशिवाय काही ठिकाणी कामाचा दर्जा हा सुमार ठेवला आहे, वास्तविक पाहता जुन्या जलवाहिन्या कालबाह्य झाल्याने त्याला समांतर अशी नवीन जल वाहिनी टाकण्यात आली असली तरी ती टाकताना काही ठिकाणी जमिनीवरुन तर काही ठिकाणी जमिनी खालुन टाकली आहे, तर ज्या ठिकाणी जमिनीखालुन ही जल वाहिनी टाकली आहे तेथील शेतकर्यांना विचारात न घेता या वाहिन्या टाकण्यात आल्याने आता ते शेतकरी येथे आडवे पडले आहेत, किंबहुना त्यांना त्यांच्या शेतातील काम करताना काही ठिकाणी खोदकाम करावे लागत आहे ते खोदकाम करताना या जलवाहिन्या अनेक ठिकाणी फुटल्या आहेत, त्यामुळे साठवण तलावापासुन पाणी जलशुध्दीकरण केंद्रावर आणताना अनेक ठिकाणी पाण्याचे कारंजे उडत आहेत, हे लिकेज काढताना आता पालिका ठेकेदाराची दमछाक होत आहे मात्र त्याचा विपरीत परिणाम हा शहराच्या पाणी पुरवठ्यावर होत आहे.
गत काही महिन्यांपुर्वी म्हसवड पालिकेची निवडणुक संपन्न झाली आहे या निवडणुकीत राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हसवड पालिकेची सत्ता ताब्यात घेताना म्हसवडकरांना पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करुन देण्याचा शब्द दिला आहे, म्हसवडकरांनीही मंत्री गोरे यांच्या या शब्दावर विश्वास ठेवुन त्यांच्या ताब्यात सत्ता म्हसवड करांनी पुर्ण सत्ता देत विरोधकांना व्हाइट वॉश दिला आहे. आता हीच म्हसवडकर जनता पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशा टाहो फोडत आहे, मंत्री गोरे यांनी योजनेसाठी भरघोस निधी उपलब्ध ही करुन दिला आहे, मात्र योजना मार्गी लागण्यास विलंब लागतोय तो जलवाहिनीच्या गळतीमुळे, आता हीच गळती थांबवण्यासाठी पालिकेचे पाणी पुरवठा सभापती युवराज सूर्यवंशी व त्यांचे मित्र धनाजी शिंदे हे पायाला भिंगरी बांधुन अहोरात्र उपाय योजना करीत आहेत, त्यांना नगराध्यक्षा पुजा विरकर व पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांचीही मोलाची साथ मिळत असल्यानेच जलवाहिनीला लागलेली गळती थांबवण्यात समाधान कारक यश आले आहे.
पुढील ८/१० दिवसांत ही गळती पुर्णपणे काढुन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असा विश्वास पाणी पुरवठा सभापती युवराज सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे, तर ना. गोरे यांनी म्हसवडकर जनतेला २४ तास पाण्याचा शब्द सत्यात उतरण्यासाठी पालिकेचे सर्व सदस्य प्रयत्न करीत असुन पुढील काही महिन्यातच त्याला पण यश येईल असा विश्वास पालिकेतील सर्व सदस्यांकडुन व्यक्त केला जात आहे.