
Dharashiv Zilla Parishad: जिल्हा परिषदेत मोठी उलथापालथ; सावंतांविरुद्ध नाराजी उघड
Dharashiv Zilla Parishad: धारशिव जिल्हा परिषदेतील सत्तासंघर्षात राज्याचे माजी मंत्री आ. तानाजी सावंत यांच्या राजकारणाला त्यांच्या बालेकिल्ल्यातच जबर धक्का बसला आहे. परंडा आणि उमरगा तालुक्यातील दोन अपक्ष सदस्यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या धर्माला हरताळ फासत सावंतांनी पडद्यामागून विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा आरोप त्यांच्या पक्षातीलच निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करून महायुतीच्या उमेदवाराचा पराभव घडवून आणण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक दावा नव्याने निवडून आलेल्या सदस्यांनी केला आहे. हाफकिन आणि खेकडासारख्या वादग्रस्त विधानांमुळे जिल्ह्याची नाचक्की झाल्याचा ठपका ठेवत, सावंतांचे पुतणे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनीही काकांच्या नेतृत्वाला रामराम ठोकत अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. लोणी गटाच्या अपक्ष सदस्य राणी रेवनाथ ढोरे यांनी आ. सावंतांची साथ सोडून राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाण्याचा निर्णय घेतला आहे. उमरगा तालुक्यातील तुरोरी गटाच्या अर्चना जाधव आणि आलूर गटाचे आप्पासाहेब मल्लिनाथ पाटील यांनीही महायुतीला पाठिंबा दिला आहे.
सध्या महायुतीकडे भाजप १९, राष्ट्रवादी ६, शिवसेना (शिंदे गट) ७ आणि अपक्ष ४ असे एकूण ३६ सदस्यांचे स्पष्ट बहुमत आहे. हे सर्व सदस्य सध्या सहलीवर असून, सावंतांच्या छुप्या राजकारणाबाबतची नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आल्याचे समजते. या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यात सावंतांचे वर्चस्व हादरले असून राणाजगजितसिंह पाटलांची पकड अधिक मजबूत झाली आहे.
उबाठाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना सुमारे दीड लाख मते मिळाली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत उबाठाच्या उमेदवारांना केवळ १५ हजार मते मिळाली आहेत. आमदार सावंतांनी त्यांची सगळी रसद लोकसभा निवडणुकीत उबाठाकडे वळवली व खासदार राजे निंबाळकर यांनी या निवडणुकीत त्यांची मते आमदार सावंतांच्या उमेदवाराकडे वळवली असल्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा असून त्यांची छुपी युती व राजकीय वस्तुस्थिती आता जनतेसमोर उघडी पडली असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.
निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या ८ सदस्यांना आ. सावंतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नेण्याऐवजी स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. पक्षांतर्गत शिस्तीचा भंग करणारी असल्याचेही कुलकर्णी यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकरणी वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार आणि कडक कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. महायुतीचा विश्वासघात करून विरोधकांना मदत करणाऱ्या सावंतांच्या भूमिकेची सविस्तर माहिती वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली आहे. जिल्ह्यातील मतदारांचा महायुतीवर असलेला विश्वास टिकवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी आग्रही मागणीही दत्ता कुलकर्णी यांनी केली आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.