कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस
जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांना सवाल करत शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी चांगलाच हल्लाबोल केला. ‘कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस आहे. राज्याचा कृषिमंत्री अशा स्वरूपाचं वक्तव्य करतो हे महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे’, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.
एकनाथ खडसे यांनी विविध मुद्यांवर भाष्य करत सरकारवर निशाणा साधला. त्यांनी मंत्री कोकाटे यांच्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस आहे. राज्याचा कृषिमंत्री अशा स्वरूपाच वक्तव्य करतो हे महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी मतदारांनी केली नव्हती. मत मागण्यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करू, अशी घोषणा तुम्ही केली होती. कर्जमाफी होत नाही म्हणून वेगवेगळ्या कारणांनी तुम्ही शेतकऱ्यांना बदनाम करत आहात हे बरोबर नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एकीकडे शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. याबाबत चिंता करण्याची आवश्यकता मंत्र्यांना भासत नाही हे दुर्दैव आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागून आपले वक्तव्य मागे घ्यावे. राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये उपचारा आधीच पैसे जमा करण्याचा आग्रह केला जातो. महात्मा ज्योतिबा फुले किंवा अन्य योजनेचा लाभ जरी असला तरी आधी पैसे द्या, मग उपचार करू, असे सर्रास रुग्णांची लूट करण्याचा प्रकार सुरू आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
…नंतर पैशांचा आग्रह धरा
तसेच काही ठिकाणी असे प्रकार होतही नसतील. मात्र, काही रुग्णालयांमध्ये असे प्रकार होत आहेत. वैद्यकीय हा व्यवसाय आहे. पैशांची आवश्यकता भासते हे ठीक आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून जी टोकाची भूमिका घेतली जाते हे चुकीची आहे. रुग्णालयांनी उपचाराआधी पैशांचा आग्रह न धरता आधी उपचार करा आणि नंतर पैशांचा आग्रह धरा, असेही त्यांनी सांगितले.