'पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ, शरीरसंबंधांपूर्वीच पतीचे...'; महिलेने केला कोर्टात दावा पण...
पुणे : पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचा आरोप करत त्याला सोडून गेलेल्या पत्नीला कौटुंबिक न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. पत्नीचा दावा सबळ पुराव्यांअभावी फेटाळत तिला दोन महिन्यांच्या आत पतीच्या घरी परत जाऊन वैवाहिक संबंध पुनर्स्थापित करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश न्यायाधीश घुले यांनी दिला आहे. केवळ आरोप करणे आणि ते कायदेशीररित्या सिद्ध करणे या दोन भिन्न बाबी असल्याचे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे.
विजय आणि स्वाती (नावे बदलली आहेत) यांचा विवाह २०२१ मध्ये झाला होता. मात्र, काही काळानंतर स्वाती या पतीचे घर सोडून निघून गेल्या. त्यामुळे विजय यांनी हिंदू विवाह अधिनियमच्या अंतर्गत वैवाहिक नातेसंबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. पत्नीने कोणताही सबळ कारणाशिवाय आपला त्याग केला असून, तिला परत नांदायला येण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली.
पतीच्या याचिकेला उत्तर देताना स्वाती यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. पती हा संशयी स्वभावाचा असून, तो शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे. लग्नानंतर एकदाही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत आणि पतीचे शरीर संबंधापूर्वीच वीर्यस्खलन होत असे, असेही तिने आपल्या लेखी जबाबात म्हटले. तसेच पत्नीने दुसर्या न्यायालयात विवाह रद्द करण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केल्याचेही म्हटले. याउलट, पतीने आपल्या याचिकेत आणि पुराव्यात हे सर्व आरोप फेटाळून लावले.
पतीचे म्हणणे नेमकं काय?
आपण शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असून, मधुचंद्रावेळी आणि त्यानंतरही त्यांच्यात आनंदी शारीरिक संबंध होते, असे पतीने ठामपणे सांगितले. संबंधित वकिलाने म्हटले की, हिंदू धर्मशास्त्रानुसार विवाह हा एक पवित्र संस्कार आहे. किरकोळ कारणे किंवा सिद्ध न झालेले आरोप यावरून ही महत्त्वपूर्ण संस्था मोडता कामा नये. पती-पत्नीमधील नातेसंबंध टिकवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
कोणताही वैद्यकीय पुरावा नाही
पत्नीने पतीच्या शारीरिक क्षमतेवर आरोप केला असला तरीही कोणताही वैद्यकीय पुरावा दिला नाही. पत्नीच्या म्हणण्यात विसंगती आहे. एकीकडे शारीरिक संबंध झालेच नाहीत, असे सांगितले जाते. तर दुसरीकडे पतीचे लवकर वीर्यस्खलन व्हायचे असे सांगणे, यातून तिच्या दाव्यावर संशय निर्माण होतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.