
प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी 'घरवापसी'
जलवाहिन्यांमध्ये अडकला होता रानगवा
बोर व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक अधिवासात केले निसर्गमुक्त
अनेकांच्या बचावकार्यामुळे रानगवा सुखरूप
पुणे: विश्रांतीनगर परिसरातील जलवाहिन्यांमध्ये अडकलेल्या आणि संपूर्ण पुण्याचे लक्ष वेधून घेतलेल्या त्या रानगव्याची अखेर ‘घरवापसी’ झाली. मंगळवारी थरारक बचाव मोहिमेनंतर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या या प्रौढ नर रानगव्याला बुधवारी वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक अधिवासात निसर्गमुक्त करण्यात आले. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेचा सुखद शेवट झाला.
पुणे महानगरपालिकेच्या दोन मोठ्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेल्या रानगव्याची पुणे वन विभागाने विविध शासकीय यंत्रणा, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने यशस्वी सुटका केली होती. सुटकेनंतर करण्यात आलेल्या सखोल वैद्यकीय तपासणीत रानगवा पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट झाले. कोणतीही गंभीर दुखापत नसल्याने त्याला निसर्गात पुनर्वसन करण्यास वैद्यकीयदृष्ट्या हिरवा कंदील देण्यात आला.
वन विभागाची ‘धडाकेबाज’ कारवाई! घोरपडीच्या अवयवांसह तस्कर जेरबंद, शिकाऱ्यांच्या मनात उडाली धडकी
त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये आणि वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील तरतुदींनुसार रानगव्याचे विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुण्यात आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विशेष वन्यप्राणी वाहतूक वाहनातून रानगव्याला सुरक्षितरीत्या बोर व्याघ्र प्रकल्पात नेण्यात आले. नवीन बोर वनपरिक्षेत्रातील नवरगाव नियतक्षेत्र, कक्ष क्रमांक २४० मध्ये त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. ही प्रक्रिया उपसंचालक मंगेश ठेंगडी यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली पार पडली, तर संपूर्ण बचाव, उपचार, वाहतूक आणि पुनर्वसन मोहिमेचे नियोजन व समन्वय पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस यांनी केले.
वणव्यांच्या तडाख्यातून जंगलांची सुटका; सुखावणारा पाऊस, टेकड्यांनी घेतला मोकळा श्वास
विश्रांतीनगरमधील बचाव मोहिमेदरम्यान रानगव्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याच्या सुरक्षित सुटकेसाठी अनेकजण प्रार्थना करत होते. अखेर हा रानगवा सुखरूप जंगलात परतल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. वन्यजीव संवर्धनासाठी विविध यंत्रणांनी केलेल्या समन्वयाचे हे एक यशस्वी उदाहरण ठरले आहे.