आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांवरसुद्धा FDAची नजर; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय
मुंबई : सण-उत्सव म्हटलं की भाविकांची गर्दी, महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांची लगबग आलीच. मात्र याच काळात मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळीचा धोका देखील वाढतो. आता या सगळ्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची (FDA) थेट नजर राहणार आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सण-उत्सवांच्या काळातील अन्नभेसळ रोखण्यासाठी ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ हा निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयानुसार वर्षभरातील प्रमुख सणांसाठी स्वतंत्र आदेश काढण्याची गरज राहणार नाही. महाप्रसाद, लंगर, भंडारे आणि सणांशी संबंधित अन्नविक्रीच्या ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे सर्व धर्मांच्या प्रमुख सणांचा यात समावेश करण्यात आला आहे.
FDAने वर्षभराचं सणांचं कॅलेंडर तयार केलं असून त्यांचं तीन स्तरांत वर्गीकरण करण्यात आलं आहे. राज्यव्यापी सणांमध्ये गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ आणि नववर्ष पूर्वसंध्येचा समावेश आहे. प्रादेशिक स्तरावर मकर संक्रांत, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी आणि कार्तिक वारी, जन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी आणि गुरुनानक जयंतीचा समावेश आहे. तर स्थानिक जत्रा, पालखी सोहळे आणि उरुस यांचाही तपासणीच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे.
FDAची मोहीम सणाच्या तब्बल 21 दिवस आधी सुरू होणार असून सण संपल्यानंतरही 30 दिवस कारवाई सुरू राहणार आहे. सुरुवातीला हाय-रिस्क अन्नपदार्थांची माहिती गोळा केली जाईल. त्यानंतर गिरण्या, घाऊक बाजारपेठा आणि वाहतुकीवर लक्ष ठेवत विशेष नाका तपासणी केली जाईल.
सणाच्या दिवशी भरारी पथकांकडून अचानक तपासणी केली जाणार आहे. महाप्रसादाच्या ठिकाणी स्वच्छता, अन्नाची हाताळणी आणि वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचीही पाहणी होईल.
भगर, साबुदाणा, राजगिरा यांसारख्या उपवासाच्या पदार्थांपासून दूध, खवा, पनीर, तूप, मिठाई आणि सुकामेव्यापर्यंत हाय-रिस्क पदार्थांची तपासणी केली जाणार आहे. मांस, पाणी आणि बर्फाच्या बाबतीत स्वच्छता आणि शीत साखळीची विशेष तपासणी होईल.
मिठाईवरील चांदीचा वर्ख खरा आहे का, खाद्यरंग नियमांनुसार वापरला आहे का, याकडेही FDAचं लक्ष असेल. ईद, रमजान, नाताळ आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर संबंधित अन्नपदार्थांची विशेष तपासणी केली जाणार आहे.
भेसळ आढळल्यास कारवाईत कोणतीही ढिलाई न ठेवता ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेतली जाणार आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई करून आवश्यक प्रकरणे न्यायालयात दाखल केली जातील. त्यामुळे आता सणाचा महाप्रसाद असो, लंगर असो किंवा भंडारा—चवीसोबत अन्नाची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.






