
मुंबई : संपूर्ण राजकीय काराकीर्द कॉंग्रेससोबत (Congress) राहिलेले व तब्बल 40 वर्षे सक्रिय राजकारणामध्ये राहिलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस पक्षाच्या पदांचा राजीनामा (Ashok Chavan Resignation) दिला आहे. काल अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे राज्याचे राजकीय चक्रे जोरदार फिरले. यानंतर अशोक चव्हाण पुढे कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अशोक चव्हाण यांनी आज आपण भाजपमध्ये जाहीर प्रवेश (Ashok Chavan Join BJP) घेणार असल्याचे जाहीर केले. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कॉंग्रेसची साथ सोडल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “आज मी माझ्या राजकीय आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रितसर भाजपात प्रवेश करणार आहे. दुपारी बारा-साडेबारा वाजता पक्षप्रवेश होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अन्य जिल्ह्यांतील संभाव्य प्रवेश होण्याची शक्यता आहे.” अशी घोषणा स्वतः अशोक चव्हाण यांनी केली. त्याचबरोबर आपल्या सोबत इतर कोणतीही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. ‘पक्षप्रवेशासाठी मी कोणालाही आमंत्रित केलेलं नाही,’ असे देखील अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
माझ्या कामातूनच मी उत्तर देईन
नवीन राजकीय सुरुवात करायला निघालेल्या अशोक चव्हाणांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “जिल्ह्यातील, मतदारसंघातील बरेच लोक मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. नवीन सुरुवात करायची आहे. जिल्ह्यातील समीकरणे आहेत, हे सगळं लक्षात घेऊन पुढील वाटचाल चांगली व्हावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे. जिथे मी राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे. भाजपात असतानाही प्रामाणिकपणे काम करेन. माझ्या कामातूनच मी उत्तर देईन” असे ठाम मत अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेशापूर्वी व्यक्त केले आहे.