
कराड उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण नसतानाही खुला करण्याची घाई; पालकमंत्र्यांची नाराजी
कराड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराडच्या उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही तो वाहतुकीसाठी खुला करण्याची घाई करण्यात आली. पुलावरील पथदिव्यांची प्रकाशयोजना अद्याप कार्यान्वित झालेली नाही, तसेच काही कामे प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम पूर्ण झाल्याचा अधिकृत हिरवा कंदील मिळाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला करणे योग्य ठरले असते, अशी स्पष्ट नाराजी पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात पाटण विधानसभा मतदारसंघातील सुपने मंडलातील विविध प्रलंबित विकासकामांचा पालकमंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कराडच्या उड्डाणपुलासह राष्ट्रीय महामार्गावरील विविध प्रश्नांवर भूमिका मांडली.
कराड परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, सेवा रस्त्यांवर पाणी साचत असल्याने वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यांच्या दुरुस्तीच्या सूचना करण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले. महामार्ग प्राधिकरणाला दुरुस्तीसाठी सुधारित कालमर्यादा देण्यात आली असून, या मुदतीत संबंधित कामे पूर्ण केली जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सुपने मंडलातील विविध प्रलंबित विकासकामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला असून, कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले. मंडलातील सरासरी ७५ टक्के विकासकामे पूर्ण झाली आहेत. जिल्हा नियोजन समिती, डोंगरी विकास, पर्यटन, तसेच अन्य विभागांमार्फत यावर्षी प्रस्तावित असलेल्या कामांची यादी १५ ऑगस्टपर्यंत मागविण्यात आली आहे. पावसाळा संपल्यानंतर प्रलंबित कामांना तातडीने सुरुवात करून ती मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुपने मंडलाला अधिक विकासकामे मिळावीत, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.
दर्जाहीन कामे नव्या कंपनीकडून
कराड-चिपळूण महामार्गाच्या कामाबाबतही नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहे, यावर बोलताना पालकमंत्री देसाई म्हणाले की, काही ठिकाणी कामाचा दर्जा अपेक्षित पातळीचा नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा ठिकाणची कामे नव्या कंपनी आणि ठेकेदारामार्फत पूर्ण करून घेतली असून, उर्वरित कामेही दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेला निर्देश देण्यात आले आहेत.
निधी वाटपात प्रशासनाने तटस्थ राहावे
कराड पंचायत समितीच्या मासिक सभेत सेस फंडाच्या वाटपावरून सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये वादावादी झाल्याची माहिती आपल्या सदस्यांकडून मिळाली आहे, असे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले. शासकीय अधिकाऱ्यांनी सत्ताधारी आणि विरोधक असा कोणताही भेदभाव न करता निधी वाटपात समतोल साधला पाहिजे. जिल्हा परिषदेत निधी वाटप करताना समानता राखावी लागते. अध्यक्ष व उपाध्यक्षांना पाच टक्के निधीच्या वापराचे अधिकार असतात. मात्र अन्य बाबतीत अधिकाऱ्यांनी समतोल भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे निधी वाटप करताना प्रशासनाने तटस्थ राहावे, असे देसाई यांनी स्पष्ट केले.