पुढील दोन दिवसांत उकाड्यात वाढ होणार (संग्रहित फोटो)
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात हळूहळू वाढ होत असून, उकाड्यात देखील चांगलीच वाढ झाली आहे. तर पुढील दोन ते तीन दिवसांत हवामानात बदल होणार असून, कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शहरातील उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
शहर आणि परिसरात शनिवारी (ता. २१) किमान तापमानात किंचित वाढ होऊन ते १७.५ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. सकाळी ढगाळ वातावरण तर दुपारी कडक ऊन पडले होते. मात्र सायंकाळी हवामानात हळूहळू बदल झाला. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ढग दाटून आले. मात्र, पावसाने हजेरी लावली नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ होणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २२) किमान आणि कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमान १८ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सोमवारपासून (ता. २३) पुढील तीन दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जाऊ शकते, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यातील अनेक भागांत तापमानात होतीये वाढ
काही दिवसांपूर्वीच, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमान ३८ ते ४० अंशांच्या दरम्यान राहिले होते. सोलापूर येथे ४०.१ अंश सेल्सिअस, मालेगाव येथे ४०.० अंश सेल्सिअस, ठाणे-बेलापूर औद्योगिक परिसरात ३९.८ अंश सेल्सिअस, जळगाव येथे ३९.४ अंश सेल्सिअस, परभणी येथे ३९.३ अंश सेल्सिअस अशी उष्णतेची तीव्रता नोंदवली गेली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तापमानात वाढ होताना दिसत आहे.
हेदेखील वाचा : देशातील अनेक भागांत वातावरणात बदल; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून अंदाज






