
नागपूर / गडचिरोली : विदर्भातील नागपूर विभागात सुरू असलेल्या संततधारेनंतर पूर आणि वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू (18 Died Due to Heavy Rain) झाला आहे तर 4500 घरांची पडझड झाली आहे. रविवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर विभागातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे 54,000 हेक्टरमधील शेतजमीन प्रभावित झाली आहे. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे.
नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूर विभागात पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये ज्या 18 जणांचा मृत्यू झाला. त्यात अमरावती 4, यवतमाळ, गडचिरोली आणि भंडाऱ्यात प्रत्येकी तीन, वर्धा, गोंदियात प्रत्येकी दोन तर चंद्रपुरातील एका व्यक्तीचा समावेश आहे.
रविवारी सकाळी चंद्रपूर-बल्लारपूर- राजुरा हा मार्ग बंद झाला. बल्लारपूर जवळील वर्धा नदीवरील पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. कोरपना तालुक्यातील भोयगाव धानोरा पुलावर 21 जुलैच्या रात्रीपासूनच पाणी आहे. त्यामुळे हा मार्ग तेव्हापासूनच बंद आहे. विदर्भातील 4500 घरांची पडझड झाली असून, 54,000 हेक्टर शेतजमीन प्रभावित झाली आहे.
39 जनावरांचा मृत्यू
अहवालानुसार, नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये 1675 घरांची पडझड झाली असून 39 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात अकोल्यात 107.9, यवतमाळ 24, वर्धा 23.4, अमरावती 15.6, नागपूर 6.7, गडचिरोली 3.0, गोंदिया 2.2, ब्रहापुरी (चंद्रपूर) 2.4 तर बुलडाणा येथे 2.0 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
पैनगंगेला पूर, गावांचा संपर्क तुटला
महाराष्ट्र आणि आंध्र सीमेलगतच्या पारडी आणि खातेरा गावाच्या मधून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुरामुळे या मार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पारडी-खातेरा मार्ग बंद झाला आहे. पारडी चंद्रपूर तर खातेरा यवतमाळ हद्दीत आहे. त्यामुळे या भागातील दोन्ही जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे