Maharashtra Rain : रायगड, रत्नागिरीसह राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज (फोटो सौजन्य-X)
पुणे : राज्यातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत आहे. असे असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीसह राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दक्षिण मराठवाड्यातील धाराशिव, लातूर तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि विदर्भातील अकोला, अमरावती या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त केली आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 24 ते 31 जुलै दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
हेदेखील वाचा : Mumbai Metro : मुंबई मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर २१ वाढीव फेर्या, आता दर ५ मिनिटांनी मेट्रो धावणार
याशिवाय, सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती या भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तीनच दिवसांपूर्वी राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने झोडपलं. पुणे, रत्नागिरी, मुंबईसह सांगलीमध्ये जोरदार पाऊस होत आहे. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे बहुतांश शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तसेच, मुंबईतील कांदिवली, बोरीवली, गोरेगाव, जोगेश्वरी, वांद्रे परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.