“मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे…", राजन साळवी पक्षांतरावर स्पष्टच बोलले (फोटो सौजन्य-X)
Uddhav Thackeray and Rajan Salvi : कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले राजन साळवी यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे एसीबीच्या रडारवर असलेले आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले राजन साळवी यांच्यावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे ते लवकरच पक्ष सोडून इतर पक्षात स्थायिक होणार असल्याच्याही चर्चेला जोर आला होता. मात्र आता या सर्व चर्चांवर राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही यावर स्पष्टच बोलले आहेत.
‘ठाकरे यांचा निष्ठावान सैनिक म्हणून माझी ओळख आहे. 2024 च्या पराभवाला आम्ही सामोरे गेलो आहोत. पराभवाचे दु:ख, खंत आणि वेदना माझ्यासकट मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला जाणवत आहे. पराभवाची खंत असताना शिवसेना भविष्याकडे वाटचाल करत आहे. भाजपा किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण तसं काही नाही. माझ्या रोजच्या कामात माझं मार्गक्रमण सुरू आहे. अशातऱ्हेच्या बातम्या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार. यात कोणतीही शंका नाही”, असं राजन साळवी म्हणाले.
“मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे हे मला तुमच्या माध्यमातून समजतय. पण या सर्व अफवा आहेत. मी निष्ठावंत सैनिक आहे. बाळासाहेबांचाच सैनिक राहणार. या बाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही” असं राजन साळवी म्हणाले. भाजपकडून ऑफर आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारणारच. तसा प्रयत्न भाजप आणि अन्य कोणाचा असू शकतो. ते भाजप नेत्यांच मत आहे”
पराभवानंतर पक्षश्रेष्ठींशी संपर्क होऊ न शकल्याने राजन साळवी नाराज असल्याची चर्चा होती. या चर्चेवर राजन साळवी म्हणाले, “पराभवनानंयतर मुंबईतील मातोश्री येथे पराभूत उमेदवारांची बैठक घेतली होती. तिथे पराभवाचं कारण आणि आत्मचिंतन करण्यात आलं. तेच आमच्यादृष्टीने महत्त्वाचं आहे.”
“एसीबीची चौकशी सुरू होती. याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्याकडून निर्णय सुट्टीनंतर अपेक्षित आहे. आमच्यावर टांगती तलवार आहे, हे मला निश्चितपणे माहितेय”, असंही ते पुढे म्हणाले.
तसेच राजन साळवी येणार असून त्यांचे स्वागत असल्याचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आबिटकर यांनी सांगितले. यावर साळवी म्हणाले, “शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वागताची भावना असते. मी मतदारसंघात संघटन कौशल्यावर काम केलय. त्या भावनेने ते बोलत असतील” उद्धव ठाकरे गटातील निवडून आलेले आमदार, माजी आमदार शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक आहे असं नरेश म्हस्के म्हणाले. या प्रश्नाव राजन साळवी म्हणाले की, “ते त्यांचं व्यक्तीगत मत असेल. मी माझ्या भावना सांगितल्या आहेत. माझ्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघातील जनतेच्या भावना महत्त्वाच्या आहेत. मी माझ्या मतदारसंघात रोजच्या पद्धतीने काम करत आहे”.