
Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? "आरोप सिद्ध करा, नाहीतर..."; भेगडेंचा शेळकेंना इशारा
वडगाव मावळमध्ये भाजपचा सुपडा साफ
आमदार सुनील शेळकेंचा नाव न घेता गंभीर आरोप
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिले चोख प्रत्युत्तर
वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १५ पैकी १५ जागांवर विजय मिळवत भारतीय जनता पक्षाचा (BJP) सुपडा साफ केला. मात्र या विजयानंतर तालुक्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगताना दिसत आहे. १५ जागांवरील विजयाच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप केल्याची चर्चा झाली. या आरोपांना प्रत्युत्तर देताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आक्रमक भूमिका घेत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे.
वडगाव मावळ येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भेगडे म्हणाले, “२०१९ च्या निवडणुकीत आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही आम्ही पराभूत झालो. मात्र निकालापूर्वी आमदार सुनील शेळके यांनी ९५ हजारांच्या फरकाने निवडून येणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते.”
Maval Politics: ‘ईव्हीएम हॅकिंगच्या नावाखाली २५-३५ लाखांची वसुली’; सुनील शेळकेंचा भाजपवर गंभीर आरोप.
ते पुढे म्हणाले की, निकालाच्या दोन दिवस आधी पराभव मान्य केल्यासारखी भूमिका घेणाऱ्या आमदारांनी अचानक एक लाख मतांच्या फरकाने विजय मिळेल असे वक्तव्य केले आणि प्रत्यक्षात ते त्या फरकानेच विजयी झाले. भेगडे यांनी सांगितले की निवडणुकीदरम्यान काही कार्यकर्ते व नागरिकांकडून ईव्हीएम संदर्भात शंका व्यक्त करण्यात आली होती. “ईव्हीएममध्ये गडबड आहे का? मतांची चोरी होते का? अशा चर्चा झाल्या. मात्र आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितले की ईव्हीएममध्ये कोणतीही छेडछाड होत नाही आणि अफवा पसरवणे चुकीचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, “ते निवडून आल्यानंतर आम्ही कधीही त्यांच्यावर आरोप केले नाहीत. पत्रकार परिषद घेतली नाही, ना जाहीर सभेत ईव्हीएममध्ये गडबड करून ते निवडून आले असे म्हटले नाही. आजपर्यंत आमच्याकडून असा एकही आरोप झालेला नाही — याचा पुरावा त्यांनी दाखवावा,” असेही भेगडे म्हणाले.
Political News : “आज अजितदादा असते तर विजयोत्सव…” मावळातील निकालानंतर आमदार सुनील शेळके झाले भावूक
सोमवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भारतीय जनता पक्षाला तालुक्यात बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शेवटी त्यांनी इशारा देत म्हटले, “सदर आरोप त्यांनी सिद्ध करावेत; अन्यथा आठ दिवसांच्या आत आम्ही अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू.”