
जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जालना : जालना जिल्ह्याची ओळख आता ‘सिल्क, सीड आणि स्टील’ अर्थात ‘ट्रिपल एस सिटी’ म्हणून निर्माण होत असून, रेशीम उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळू शकते, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जालना येथील रेशीम कोष बाजारपेठ इमारतीचे लोकार्पण आणि कोनशिला अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अंबड येथील पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे तसेच सात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नवीन इमारतींचेही लोकार्पण करण्यात आले.
कापूस आणि सोयाबीन या पारंपरिक नगदी पिकांवर जालना जिल्ह्यातील अनेक शेतकरी अवलंबून आहेत. मात्र, शेतकऱ्यांना अतिरिक्त आणि पर्यायी उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी रेशीम शेतीला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीही रेशीम शेती फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची माहिती उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केवळ रेशीम कोष उत्पादनापुरते मर्यादित न राहता त्यापुढे धागानिर्मिती, वस्त्रनिर्मिती, साडी विणकाम, ब्रँडिंग आणि बाजारपेठ अशी संपूर्ण मूल्यसाखळी जालन्यात उभारण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
जालन्यातील महिलांनी रेशीमपासून साडी विणण्यास सुरुवात केली असून त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळाल्यास रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. शेतकरी, महिला, विणकर, व्यापारी आणि युवकांना या उद्योगाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जालन्यात तयार होणाऱ्या रेशीम उत्पादनांना स्वतंत्र ओळख मिळावी यासाठी ‘जालनाई’ या ब्रँडची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. ‘जालनाई’ ब्रँडच्या लोगोचेही यावेळी अनावरण करण्यात आले.
पैठणीला जशी देश-विदेशात ओळख मिळाली, त्याच धर्तीवर जालना सिल्कलाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
Raigad Farmer News : – १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी
जालना येथील ड्रायपोर्टमुळे रेशीम उत्पादनांना देशांतर्गत बाजारपेठेसोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रेशीम बाजारपेठ आणि ड्रायपोर्ट या दोन्ही सुविधा जालना सिल्कच्या विस्तारासाठी महत्त्वाच्या ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
यावेळी मंत्री पंकजा मुंडे, संजय सावकारे, आमदार बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, संतोष दानवे, नारायण कुचे, हिकमत उढाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.