
विठ्ठल दर्शनाची ओढ ठरली अखेरची वाट; जेजुरीजवळ अपघातात मिरज तालुक्यातील तीन माऊलींचा मृत्यू
या अपघातात नंदा पवार (रा. कवलापूर), माधवी राजाराम सलगरे (रा. मालगाव) आणि राजश्री शंकर भोसले (रा. कसबे डिग्रज) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच तिन्ही गावांमध्ये शोक व्यक्त करण्यात आला. मृतांच्या घरासमोर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या महिला वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आणि वारीत सहभागी होण्यासाठी उत्साहाने निघाल्या होत्या. नामस्मरण करत पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू असतानाच जेजुरीजवळ झालेल्या अपघाताने त्यांचा प्रवास कायमचा थांबला. विठ्ठलाच्या दर्शनानंतर सुखरूप घरी परतण्याची कुटुंबीयांची अपेक्षा एका क्षणात धुळीस मिळाली. या दुर्घटनेची माहिती मिळताच कवलापूर, मालगाव आणि कसबे डिग्रज या गावांमध्ये शोकमय वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी दुकाने अर्धवट बंद ठेवण्यात आली, तर ग्रामस्थांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
या अपघातात अक्काताई बबन कोळी, शांता शिवबा कालकोपर, कासाबाई रास्ते, लक्ष्मी विठ्ठल गर्दे आणि शामराव चव्हाण हे जखमी झाले असून त्यांच्यावर जेजुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती लक्षात घेऊन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि विठ्ठलभक्तीच्या मार्गावर निघालेल्या तीन माऊलींचा असा दुर्दैवी अंत झाल्याने केवळ त्यांच्या कुटुंबीयांवरच नव्हे, तर संपूर्ण सांगली जिल्ह्यातील वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेऊन परत येऊ,” असे सांगून घराबाहेर पडलेल्या या माऊली पुन्हा कधीच घरी परतणार नाहीत, ही वेदना प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली आहे.