Jejuri Warkari Accident : वारीदरम्यान भीषण दुर्घटना! वारकऱ्यांच्या दिंडीला दिंडीच्याच ट्रकने उडवले; ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबीसीकर यांच्या दिंडीचा ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबेडिगराज येथील दिंडीतील महिला वारकरी यांच्यात हा अपघात झाला. या दुर्घटनेत तीन महिलांचा मृत्यू झाला असून, चार महिलांना दुखापत झाली आहे.
जखमींना तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासह पंचनामा व अन्य कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे वारी मार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील कार्यवाही सुरू ठेवली आहे.
या अपघातानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारीच्या काळात सासवड–जेजुरी मार्गावर मोठ्या प्रमाणात वारकरी, दिंड्या आणि जड वाहने एकाच मार्गाने प्रवास करत असतात. अशा परिस्थितीत जड वाहनांची हालचाल, वेग नियंत्रण, स्वतंत्र लेन, तसेच संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त याबाबत पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वारकरी संघटनांकडूनही दरवर्षी वारी मार्गावरील सुरक्षिततेबाबत अधिक प्रभावी नियोजनाची मागणी केली जाते. या पार्श्वभूमीवर बेलसर टोलनाक्याजवळ झालेल्या या दुर्घटनेमुळे वारी मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा आणि सुरक्षा आराखड्याचा फेरआढावा घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून पालख्या निघतात. यंदाही आषाढी वारीसाठी अनेक वारकीर चालत पंढीरीला निघाले आहेत. परंतु आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने या आषाढी वारीला गालबोट लावला.






