
कराड: तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेषतः टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून, पाण्याखाली गेलेल्या शेतांमुळे काढणीचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर माळवाची पिकेही अतिवृष्टीमुळे धोक्यात आली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कोपर्डे हवेली, काले, कार्वे आदी परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड करण्यात आली होती. काही ठिकाणी उत्पादनाची सुरुवातही झाली होती. मात्र, सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी आणि चिखल साचल्याने मजुरांना काढणीसाठी शेतात उतरणे अशक्य झाले आहे. परिणामी तयार झालेला माल शेतातच अडकून पडत असून दर्जावरही परिणाम होत आहे.
सततचे ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता आणि ओलावा यामुळे करपा, बुरशीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती कृषी क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता असून, मोठा खर्च करून उभे केलेले पीक वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.
लागवड, खते, औषध फवारणी आणि मजुरीवर लाखो रुपयांचा खर्च झाल्यानंतरही तो वसूल होईल की नाही, याबाबत शेतकरी साशंक आहेत. दरम्यान, पावसामुळे बाजारात दर्जेदार टोमॅटोची आवक घटल्यास भाव वाढू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. मात्र उत्पादनातच मोठी घट झाल्यास वाढलेल्या दराचाही शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळणे कठीण असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.