
फोटो सौजन्य - Social Media
उद्यानांमुळे चिमुकल्यांचे बालपण पुन्हा बहरले असून, अभ्यासाच्या ताणातून वेळ काढत मुले संध्याकाळच्या वेळी झोपाळे, घसरगुंडी आणि हिरव्यागार मैदानांमध्ये मनमुराद खेळताना दिसतात. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
ही उद्याने केवळ मुलांसाठीच नव्हे, तर तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही ‘रिफ्रेशमेंट झोन’ ठरत आहेत. पहाटेच्या वेळी अनेक नागरिक येथे फिरणे, योगासने आणि व्यायाम करताना दिसतात. गजबजलेल्या शहरात शांततेचे काही क्षण अनुभवण्यासाठी ही ठिकाणे नागरिकांची पसंती बनत आहेत. मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षलागवडीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली असून वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासाही मिळत आहे. हिरवाईमुळे पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागत आहे.
नगर परिषद नागरिकांना उत्तम सुविधा देण्यावर भर देत आहे. ‘नाना-नानी पार्क’ आणि ‘नटराज गार्डन’ यांसारख्या उद्यानांची देखभाल कायम ठेवण्यासाठी नाममात्र प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी सांगितले. हे शुल्क उद्यानांची स्वच्छता, झाडांची निगा, पाणीपुरवठा आणि साधनसामग्रीच्या दुरुस्तीसाठी वापरले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध वयोगटातील नागरिक एकत्र येत असल्याने या उद्यानांमुळे सामाजिक संवाद वाढण्यासही मदत होत असून, खामगावचा ‘ग्रीन पॅटर्न’ इतर शहरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.