
पाण्याच्या दाबाने मातीचा भराव ढासळला हे पाणी कायमस्वरुपी रोखण्यासाठी शुक्रवारी आंदोलन अंकुश संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी काळ्या ओढ्यात जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने मातीचा भराव व सिमेंटचे पाईप टाकत बांध घातला होता. बांध घातल्यानंतरही काळ्या ओढ्यातून पाण्याचा प्रवाह सुरुच राहिला होता. परिणामी शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत ओढ्यातील पाण्याचा तुंब आमराई रोडवरील ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसरापर्यंत आला होता. मात्र साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या दाबाने मातीचा भराव ढासळला आणि बांध फुटुन पाणी पुन्हा प्रवाहित झाले.
प्रदूषित पाणी बंद करण्यासाठी उपाययोजनांची गरज
ही माहिती समजताच टाकवडे, शिरढोणमधील नागरीक प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी केली. नदीत मिसळणारे प्रदुषित पाणी कसे बंद होईल यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले शुक्रवारी घातलेला बांध अधिक मजबुत करण्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टरसह काही कार्यकर्ते आले होते. मात्र घातलेला बांध फुटल्याने पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहत यंत्रसामुग्रीसह कार्यकर्ते थांबून होते.
कोर्टाच्या आदेशानंतरही शासकीय यंत्रणा ढिम्मच
पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात यापूर्वी वेळोवेळी न्यायालयाने आदेश दिले आहेत. मात्र कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकासह प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर कायमस्वरूपी कोणतीच उपाययोजना करत नाही, पंचगंगा नदीत थेट मैला मिश्रित पाणी सोडले जात असतानाही प्रशासन यावर काहीच कारवाई करत नाही.
विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनाही याचे काहीच सोयर सुतक उरले नाही. टिम्म प्रशासनामुळे नदी काठच्या लाखो नागरिकांच्या जीवाशी का खेळले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. शिरोळ तालुक्यातील 11 गावच्या नागरिकांनी आंदोलन करून या काळ्या ओढ्यातील प्रदूषीत पाणी भराव टाकून आडविले होते.