
Leopard attack
बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे. शेतीकामासाठी पहाटे लवकर किंवा सायंकाळी उशिरा शेतात जाणे आता जिवावर बेतणारे ठरत आहे. ऊसतोड मजूर, महिला आणि दूध उत्पादक शेतकरी रोजचा प्रवास करताना जीव मुठीत धरून बाहेर पडत आहेत. अनेक गावांमध्ये पालकांनी मुलांना घराबाहेर पाठवणे बंद केले असून, शाळा आणि क्लासेसच्या वेळेवरही याचा परिणाम झाला आहे. सायंकाळ होताच गावांतील रस्ते ओस पडत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
वनविभागाने काही ठिकाणी पिंजरे लावले असले आणि गस्त वाढवल्याचा दावा केला असला, तरी ग्रामस्थांच्या मते या उपाययोजना अपुऱ्या आहेत. बिबट्याचा वावर केवळ एका विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित नसून तो वेगाने विस्तारत आहे. त्यामुळे अधिक पिंजरे बसवणे, रात्रीची गस्त वाढवणे, ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे या मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी समूहाने बाहेर पडावे, हातात काठी आणि टॉर्च ठेवावा तसेच रात्रीच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करून या दहशतीतून मुक्त करावे, हीच मुख्य मागणी आता जोर धरत आहे.