
जिवंत असताना मतदार यादीत दाखविले मयत, काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप; उपोषणाचाही दिला इशारा
चाकूर : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेदरम्यान चाकूर शहरातील मतदार यादीत गंभीर त्रुटी आढळल्याचा आरोप चाकूर काँग्रेसचे शहराध्यक्ष हुसेन (पप्पुभाई) रज्जाक शेख यांनी केला आहे. स्वतःचे नाव मतदार यादीतून वगळून ‘मयत’ यादीत टाकण्यात आल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकूर शहरातील भाग क्रमांक २८९ मध्ये त्यांचे नाव २००२ पासून मतदार यादीत समाविष्ट असून त्याची मॅपिंगही झाली आहे. विशेष पुनरिक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओकडे गणना फॉर्म भरण्यासाठी गेल्यानंतर त्यांचे नाव यादीत दिसून आले नाही. सखोल चौकशीअंती बीएलओकडून त्यांचे नाव ‘मयत’ यादीत असल्याचे सांगण्यात आले. ही बाब समजल्यानंतर मोठा मानसिक त्रास झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात चौकशी केली असता, २००२ पासून नाव अस्तित्वात असूनही एप्रिल महिन्यात ते ‘मयत’ म्हणून वगळण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ व पुतण्यांची नावे मतदार यादीत कायम असताना केवळ स्वतःचेच नाव वगळण्यात आल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा प्रकार केवळ तांत्रिक चूक नसून जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा संशय व्यक्त करत, यामागील दोषी अधिकाऱ्यांवर कायमस्वरूपी बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आपण राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी असल्याने राजकीय हेतूने मतदानाच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.
तहसीलसमोर आमरण उपोषणाचा दिला इशारा
याप्रकरणात २८ जुलै २०२६ पर्यंत न्याय न मिळाल्यास तहसील चाकूर कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा हुसेन (पप्पुभाई) शेख यांनी दिला आहे. आपण मधुमेह व उच्च रक्तदाबाचे रुग्ण असल्याचे नमूद करत, उपोषणादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.