
'सीएसएमटी 'च्या घुमटाला गळती! जुन्या दगडांचा सच्छिद्रपणा कारणीभूत; आरएलडीएने दिले स्पष्टीकरण
मुंबईची ओळख असलेल्या आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील ऐतिहासिक मध्यवर्ती घुमटातून झालेल्या गळतीमागील कारण स्पष्ट झाले आहे. शंभराहून अधिक वर्षे जुन्या दगडी बांधकामातील सांधे आणि कालांतराने सच्छिद्र झालेल्या दगडांमधून पावसाचे पाणी आत शिरत असल्याने ही गळती होत असल्याचे रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (आरएलडीए) ने सांगितले आहे. सलग चार दिवसांच्या मुसळधार पावसानंतर सीएसएमटीच्या मध्यवर्ती घुमटातून पाणी गळू लागले. त्यानंतर घुमटाखालील फोयर परिसर तात्पुरता बंद करण्यात आला. गळणारे पाणी नियंत्रित करण्यासाठी जमिनीवर शोषक चटया टाकण्यात आल्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात बॅरिके उभारण्यात आले.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
आरएलडीएने दिलेल्या माहितीनुसार, ही गळती शतकभराहून अधिक काळ पाऊस, उष्णता आणि वातावरणातील बदलांना तोंड देणाऱ्या दगडी बांधकामातील सांधे कमकुवत झाल्यामुळे होत आहे. तसेच काही दगड नैसर्गिकरीत्या सच्छिद्र झाल्याने त्यातून पावसाचे पाणी झिरपत असून त्यामुळे घुमटात गळती निर्माण झाली आहे. वारसास्थळ असल्यामुळे या इमारतीवर आधुनिक जलरोधक साहित्याचा वापर करता येत नाही. मूळ वास्तुशैली आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य जपत पारंपरिक संवर्धन पद्धतीनेच दुरुस्तीचे काम सुरू आहे.
आरएलडीएच्या माहितीनुसार, घुमटातील गळतीची कायमस्वरूपी दुरुस्ती सुरू असून संपूर्ण संवर्धन प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उघड झालेल्या या गळतीनंतर आवश्यक दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू असून ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप जपत संवर्धन केले जात आहे.
या संवर्धनासाठी वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय), भारतीय राष्ट्रीय कला व सांस्कृतिक वारसा न्यास (इंटॅक), केंद्रीय भवन संशोधन संस्था (सीबीआरआय), वारसा संवर्धन तज्ज्ञ आणि संरचनात्मक अभियंते यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे.दगडी सांध्यांवर पारंपरिक चुना आणि गुळाचे मिश्रण वापरले जात असून, ग्रॅव्हिटी ग्राउटिंग तंत्राद्वारे दगडांतील पोकळ्या भरल्या जात आहेत.सच्छिद्र दगडांवरील उपचारासाठी अंतिम कार्यपद्धती तज्ज्ञ निश्चित करत आहेत.