
फोटो सौजन्य - Social Media
करवंडची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी असून, या भूमीतील प्रत्येक कणात शिवकालीन परंपरा, शौर्य आणि स्वाभिमान दडलेला आहे. या समृद्ध वारशाला उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात येणारा करवंड महोत्सव हा केवळ उत्सव नसून शिवरायांच्या विचारांचा जागर आहे, असे प्रतिपादन आमदार श्वेता महाले पाटील यांनी केले.
चिखली विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक करवंड महोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. बुधवारी चिखली येथील तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत महोत्सवाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विजय सवडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आ. महाले यांनी सांगितले की, या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलावंत, शाहीर आणि मावळे यांच्या सहभागातून शिवकालीन इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात शोभायात्रा हे मुख्य आकर्षण असणार आहे. यात घोडे, रथ, पालखी, शिवकालीन वेशभूषा केलेले मावळे, लेझीम, ढोल-ताशे, आतषबाजी, चित्ररथ, तसेच शस्त्र व नाणे प्रदर्शन यांचा समावेश असेल. याशिवाय शाहीरांचे कार्यक्रम आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे महोत्सव अधिक रंगतदार होणार आहे.
“ही शिवभक्तीची आणि संस्कृतीची पर्वणी असून, करवंडच्या पावन भूमीतून शिवकालीन इतिहास अनुभवण्याची ही सुवर्णसंधी आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, शेलसूर येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ व बहुउद्देशीय मंडळाने महोत्सवासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या भोजन व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारली आहे. यापूर्वीही मंडळाकडून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली असून, महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविण्यात आली. बैठकीस गटविकास अधिकारी समाधान वाघ, ठाणेदार जयसिंग राजपूत, प्राचार्य अण्णासाहेब म्हळासने, प्रा. विजय घ्याळ, तसेच विविध राजकीय व सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंडप, सत्कार, सांस्कृतिक, भोजन, सुरक्षा, स्वयंसेवक, प्रसिद्धी व स्वच्छता अशा विविध समित्यांची स्थापना करून महोत्सव यशस्वी करण्याचा संकल्प करण्यात आला.