फोटो - सोशल मीडिया
कोल्हापूर : राज्यामध्ये विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. गडावर झालेल्या धार्मिक अतिक्रमणाच्या विरोधात अनेक शिवप्रेमींनी आवाज उठवला आहे. मागील अनेक महिन्यांपासून गड संवर्धन करणाऱ्या लोकांचे व शिवभक्तांचे या संदर्भात आंदोलन सुरु आहे. अगदी विधीमंडळासमोर देखील आंदोलन करण्यात आले आहे. विविध माध्यमांतून विशाळगड बचाओ अशी मोहिम घेण्यात येत आहे. विशाळगड अतिक्रमणाबाबत आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी विशाळगडावर मोर्चा देखील काढला. यानंतर अखेर राज्य सरकारने विशाळगड अतिक्रमण प्रकरणावर प्रतिक्रिया देत कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
संभाजीराजे छत्रपतींसोबत चर्चा
विशाळगड वाचवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी लाखो शिवभक्तांसह विशाळगड दौरा केला. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात सकाळपासून झाली असून पावनखिंडीतून संभाजीराजे छत्रपती हे विशाळगडावर जाणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी विशाळगडाच्या अतिक्रमणाबाबत देखील कारवाईचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत माझी संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत चर्चा झाली आहे. विशाळगडाचे पावित्र्य जपले जाईल असे देखील संभाजीराजे छत्रपती यांना सांगण्यात आले आहे. त्यांच्यावर झालेल्या दगडफेकीबाबत देखील जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे,” असे मत एकनाथ शिंदे यांनी मांडले आहे.
कायदेशीर बाबी पाहून योग्य ती कारवाई करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर विशाळगडावर कारवाई केली जाईल अशी भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या बाबत चर्चा झाली आहे. त्यांची जी मागणी आहे की, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यात यावे. गडावरचं अतिक्रमण काढून त्यांचे पावित्र्य जपले पाहिजे. गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व जपले आहे अशी भूमिका शासनाची देखील आहे. फक्त विशाळगडच नाही तर प्रत्येक प्रत्येक गड किल्ल्याबाबत शासन नक्की विचार करत आहे. कायदेशीर आणि इतर बाबी तपासून विशाळगडाच्या अतिक्रमणाबाबत योग्य ती कारवाई केली जाईल,” अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.