
Sunil Tatkare, Chhagan Bhujbal, Devgiri Meeting, Maharashtra Politics,
देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी थेट पक्ष नेतृत्वालाच थेट जाब विचारल्याने वातावरण चांगलेच तापल्याचे बोलले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत उपस्थित असूनही प्रफुल पटेल यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या बैठकीला उपस्थित होते. माहितीनुसार, बैठकीत सुनील तटकरे यांच्या कठोर वक्तव्यांमुळे त्यांची आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकही झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
“अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष एकसंध ठेवण्यात मी आणि प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तटकरे यांनी सांगितले “पक्ष एकसंध ठेवणे आणि तो सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थिर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत आमच्यावर सातत्याने टीका होत असताना पक्षातील एकही आमदार किंवा नेता आमच्या समर्थनासाठी पुढे आला नाही,” अशी खंत तटकरे यांनी व्यक्त केल्याचे समजते.
तसेच, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांमुळे माझ्यावर आणि प्रफुल पटेलांवरच टिका केली जाऊ लागली. हे सर्व होत असताना त्यावेळी पक्षातील कोणत्याही नेत्याने आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला नाही. अशी खंतही तटकरे यांनी बैठकीत म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
“प्रत्येक वेळी मी आणि प्रफुल पटेलांनीच टीकेचे धनी का व्हायचे? याबाबत वरिष्ठ नेतृत्व काही भूमिका घेणार आहे की नाही?” असा थेट सवालही तटकरे यांनी बैठकीत उपस्थित केला. सुनील तटकरेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे बैठकीत काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
अशातच, “जे झालं ते झालं, आता त्यावर अधिक चर्चा न करता पुढे जाण्याची गरज आहे,” असे म्हणत तटकरेंच्या या पक्ष नेतृत्त्वावरील नाराजीवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण भुजबळांच्या या विधानाकडे दुर्लभ करत तटकरेंनी पुन्हा एकदा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ” मी यावर बोलणारच आणि याबाबत आता मला स्पष्टता मिळालयाच हवी.” असे त्यांनी ठणकावून सांगितल्याचे समजते.
या सर्व बैठकांच्या घडामोडीमंध्ये एक वेगळाच तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, तटकरे बोलण्यासाठी उभे राहण्यापूर्वीच पार्थ पवार हे अचानक बैठकीतून बाहेर पडल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. तटकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर बैठकीत उपस्थित असलेल्या अन्य आमदारांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळल्याचे सांगितले जात आहे. अखेरीस कोणतीही पुढील चर्चा न होता बैठक संपल्याची माहिती समोर आली आहे.