
महालात पुन्हा कोसळली भिंत
नागपूर : शहरात वारंवार भिंती कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. शनिवारी अशीच एक घटना महाल परिसरात घडली. येथे भिंत कोसळल्याने २ जण जखमी झाले. तसेच काही वाहनेही नुकसानग्रस्त झाली. माहिती मिळताच मनपाचे पथक बुलडोझरसह घटनास्थळी दाखल झाले आणि मलबा हटवण्याचे काम सुरू केले. विशेष म्हणजे, १ महिन्याच्या आत भिंत कोसळण्याची ही तिसरी घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी महालातील गांधी गेटजवळील एका भिंतीचा काही भाग अचानक कोसळला. घटना घडली तेव्हा विक्रम भगत आणि भगवान कामठे हे खाली उभे होते. भिंतीचा कोसळलेला भाग अंगावर पडल्याने दोघेही जखमी झाले. सुदैवाने दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आणि मोठी दुर्घटना टळली. अपघातावेळी खाली उभी असलेली २ वाहनेही नुकसानग्रस्त झाली. घटनेची माहिती मिळताच मनपाचे पथक घटनास्थळी पोहोचले. जेसीबीच्या मदतीने भिंतीचा मलबा हटविण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
जीर्ण इमारतींच्या तपासणीवर पुन्हा प्रश्नचिन्ह
जीर्ण इमारतींवर मनपाकडून कारवाई होत असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, शनिवारी महालात घडलेल्या भिंत कोसळण्याच्या घटनेमुळे जीर्ण इमारतींच्या तपासणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता जबाबदार अधिकारी जीर्ण इमारतींच्या तपासणीला किती गांभीर्याने घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नांदेडमध्ये पुलाची भिंत कोसळली
मिसिंग लिंकवरील दरड कोसळण्याच्या घटनेवरून राज्यभरात संतापाचे वातावरण असताना आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये याची पुनरावृत्ती झाली आहे. नांदेड शहरातील विष्णुपुरी येथील पुलाची संरक्षण भिंत कोसळून दोन विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली असून, यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.