डोंबिवली : लोकवस्ती वाढतेय तशी जागेची मागणी आणि किंमतही वाढत जात आहे. दिवसेंदिवस याच कारणाने मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे कित्येक वर्ष महामार्गालगत राहणाऱ्या स्थानिकांना याचा नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे. या त्रासाला अपवाद KDMC देखील नाही. कल्याण डोंबिवली हद्दीतील कल्याण फाटा ते नवी मुंबईतील कळंबोली महामार्ग आठ पदरी महामार्ग करा, अशी मागणी माजी स्थानिक आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जुना मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर कल्याणफाटा ते कळंबोली पर्यंत मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असते. उरण जे.एन.पी.टी. बंदरातून दररोज सुमारे 20 ते 25 हजार कंटेनर, अवजड वाहने नाशिक, गुजरात तसेच इतर राज्यांमध्ये येत – जात असल्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. याच परिसरात लोकनेते दि. बा. पाटील नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे या महामार्गावरून भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे सध्या असलेला चार पदरी महामार्ग आठ पदरी करावा अशी मागणी माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून पत्राद्वारे केली आहे.
दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा हा एकमेव महामार्ग आहे. सदरचा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत येतो. सदरचा चार पदरी महामार्ग अपुरा पडत असून तो आठ पदरी केल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी दूर होवून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या महामार्गावरून पुणे, मुंबई तसेच कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावार वाहतूक होत असते.या महामार्गावर अवजड वाहन बंद पडले अथवा अपघात झाला तर या महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे कल्याण फाटा ते कळंबोली महामार्ग आठ पदरी करण्यासाठी माजी आमदार सुभाष भोईर यांचा सतत पाठपुरावा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.