
नसरापूर प्रकरणात न्याय मिळाला; आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातही तोच नियम लावा – मनोज जरांगे पाटील
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्परतेचे कौतुक केले. त्याचवेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर गंभीर गुन्ह्यांमध्येही अशाच वेगाने न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, नसरापूर प्रकरणात शासनाने तत्परता दाखवली आणि अवघ्या दोन महिन्यांत न्याय मिळाला, ही चांगली बाब आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री साहेबांचे कौतुक केले पाहिजे. त्यांनी या प्रकरणात तत्परता दाखवली आणि अल्पावधीत आरोपीला शिक्षा झाली. हाच नियम संतोष देशमुख हत्या प्रकरणात, तसेच मालेगाव येथील तीन वर्षीय मुलीच्या प्रकरणातही लागू केला पाहिजे.”
त्यांनी पुढे सांगितले की, नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याने पीडित कुटुंबाला आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळाला आहे. मात्र, संतोष देशमुख, महादेव मुंडे आणि मालेगावसारख्या गंभीर प्रकरणांमध्येही जलदगतीने न्याय मिळणे तितकेच आवश्यक आहे.
यावेळी शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “मी शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होतो. सरकार असो किंवा विरोधक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जे आंदोलन करतात, त्यांच्यासोबत मी उभा राहतो. बच्चू कडू आणि रोहित पवार यांच्या आंदोलनांबाबतही माझी हीच भूमिका आहे.”
नसरापूर प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात जलद न्यायप्रक्रियेबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाली असून, याच धर्तीवर इतर संवेदनशील गुन्ह्यांमध्येही तत्पर कारवाई आणि न्याय मिळावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, न्यायालयाने अत्यंत योग्य निर्णय दिला आहे; अशा मारेकऱ्यांना समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचे मनापासून आभारही मानले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सरकारी वकील अजय मिसर यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. अत्यंत कमी वेळेत संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल त्यांनी तपास यंत्रणांचे कौतुक केले.