
मिरा-भाईंदरमध्ये भीषण दुर्घटना! २४व्या मजल्यावरून सिमेंट ब्लॉक कोसळला; महिलेसह चार जण जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळपासूनच काशीमीरा परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा तडाखा सुरू होता. त्याचदरम्यान निर्माणाधीन इमारतीच्या वरच्या मजल्यावर ठेवलेला सिमेंटचा पेव्हर ब्लॉक अचानक खाली कोसळला. हा ब्लॉक थेट लगतच्या चाळीच्या पत्र्याच्या छताला फोडून घराच्या आतील भागात पडला. त्या वेळी घरातील सदस्य झोपेत असल्याने त्यांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही.
दुर्घटनेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणि जखमी झालेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.या दुर्घटनेत प्रियंका सतीश चौबे, सतीश चौबे, धर्मेंद्र सोनी आणि संतोष जाधव हे चार जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी प्रियंका सतीश चौबे यांच्यावर ऑर्बिट रुग्णालयात, तर सतीश चौबे, धर्मेंद्र सोनी आणि संतोष जाधव यांच्यावर पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर काशीमीरा पोलीस, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. निर्माणाधीन इमारतीवरील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात येत असून, नेमका पेव्हर ब्लॉक कशामुळे खाली पडला याचा तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे वर ठेवलेले बांधकाम साहित्य सैल होऊन खाली पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी बांधकाम व्यावसायिकांच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्याच्या काळात उंच इमारतींवर सुरू असलेल्या बांधकामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे निरपराध नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचे सांगत संबंधित बिल्डर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. तसेच संबंधित बांधकाम प्रकल्पातील सुरक्षाव्यवस्थेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.