'माळीवाडा वेस'च्या वादात खासदार निलेश लंके यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र
अहिल्यानगर येथील प्राचीन आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष देणारी माळीवाडा वेस ही केवळ दगडी रचना नसून शहराच्या स्थापनेपासून अँग्लो-मराठा युद्धांपर्यंतचा इतिहास जपणारा एक महत्त्वपूर्ण वारसा ठेवा आहे. या वेशीचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता, ती पाडणे किंवा स्थलांतरित करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. माळीवाडा वेसचे जतन आणि संवर्धन करण्यात यावे, ती पाडू अथवा स्थलांतरित करू नये, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात लंके यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांना पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, माळीवाडा वेसचे ऐतिहासिक महत्त्व अत्यंत मोठे आहे. इ.स. 1490 ते 1494 या कालावधीत शहराच्या स्थापनेशी संबंधित असलेली ही रचना निजामशाही काळातील तटबंदीचा अविभाज्य भाग मानली जाते. तसेच, शाहजहानच्या काळातील किल्लेदार सर्जेखान यांनी बांधलेल्या तटबंदीच्या प्रमुख प्रवेशद्वारांपैकी ती एक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
Ahilyanagar News: आमदार सत्यजित तांबेना भाजपात घेण्याचा विचार? मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी सुनावले
माळीवाडा वेसला सन 1803 च्या अँग्लो-मराठा युद्धाच्या घटनांशीही ऐतिहासिक संबंध असल्याचे पत्रात म्हटले आहे. शहरातील 11 ऐतिहासिक दरवाज्यांपैकी अजूनही अस्तित्वात असलेल्यांपैकी ही एक महत्त्वाची वेस आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांशी, सामाजिक-सांस्कृतिक परंपरांशी आणि शहराच्या ऐतिहासिक ओळखीशीही या वास्तूचा जवळचा संबंध आहे. 1959 मध्ये येथे महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसवण्यात आला होता, तसेच शहरातील पहिल्या एसटी बस सेवेचा प्रारंभबिंदू म्हणूनही या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे.
लंके यांनी पत्रात म्हटले आहे की, ही वास्तू भारतीय संविधानाच्या कलम 49 अंतर्गत ऐतिहासिक हितसंबंध म्हणून संरक्षणास पात्र आहे. या कलमानुसार ऐतिहासिक आणि कलात्मक महत्त्व असलेल्या वारसा स्थळांचे जतन करण्याची जबाबदारी राज्याची आहे. त्यामुळे माळीवाडा वेस पाडणे किंवा स्थलांतरित करण्याऐवजी तिचे जतन, संवर्धन आणि पुनर्संचयितीकरण करणे आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या ऐतिहासिक वास्तूची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) किंवा संबंधित वारसा प्राधिकरणामार्फत सखोल तपासणी करण्यात यावी, तसेच तिला अधिकृत वारसा स्थळ म्हणून नोंद देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही खा. लंके यांनी केली आहे. एखाद्या तज्ज्ञ समितीमार्फत या वास्तूच्या ऐतिहासिक महत्त्वाचे मूल्यमापन करून तिच्या जतन आणि संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
Vasai News : घरगुती गॅसचा गैरवापर; हॉटेलमधील तिघांवर पुरवठा विभागाची कारवाई
शहराचा विकास करताना ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी हेरिटेज-स्मार्ट रोड, वाहतूक पुनर्रचना, संरक्षक भिंती, प्रकाशयोजना आणि हेरिटेज कॉरिडॉर यांसारख्या पर्यायी उपाययोजनांचा विचार केला जाऊ शकतो, असेही खा. लंके यांनी पत्रात सुचवले आहे. त्यामुळे माळीवाडा वेस पाडण्याचा किंवा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेऊ नये आणि याबाबत संबंधित प्रशासनाला आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे.






