
Mumbai News: नालेसफाईच्या कामांना वेग! अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महापालिकेकडून पश्चिम उपनगरांतील मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामांना युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी मंगळवार ५ मे रोजी विविध ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली, नाल्यांमधील गाळ काढण्याचा वेग वाढवून सर्व कामे ३१ मे पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.(फोटो सौजन्य – AI)
डॉ. विपिन शर्मा यांनी मंगळवारी सकाळी पश्चिम उपनगरांतील कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरातील नाल्यांच्या सफाई कामांची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी दहिसर येथील पायल हॉटेल जंक्शन, रिव्हर व्यू ब्रिजजवळील दहिसर नदी, मलजल प्रक्रिया केंद्र, आर/मध्यविभागातील म्हात्रे नाला, आर/दक्षिण विभागातील पोईसर नदी आणि लालजी पाडा अशा विविध ठिकाणांना भेटी देऊन सुरू असलेल्या कामांची बारकाईने पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. शर्मा म्हणाले की, पावसाळा सुरू होण्यास अद्याप वेळ असला, तरी पूर्वतयारी म्हणून नालेसफाईच्या कामांना गती देणे आवश्यक आहे. ३१ मे ही अंतिम मुदत असून तोपर्यंत सर्व नाले स्वच्छ झाले पाहिजेत.विशेषतः नाल्यातून काढलेला गाळ पुन्हा रस्त्यावर किंवा नदीत जाणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि त्याची विहित वेळेत योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी.
Dr. Neelam Gorhe News: डॉ. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू बिनविरोध; विधानभवन येथे अधिकृत घोषणा
या पाहणी दौऱ्यात सभागृह नेते गणेश खणकर, आर/मध्य आणि आर/उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर, आर/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष लीना देहरकर, नगरसेविका योगिता पाटील, अंकिता यादव यांच्यासह उपआयुक्त (परिमंडळ ७) मनीष वळंजू, सहायक आयुक्त रोहित त्रिवेदी, सहायक आयुक्त डॉ. प्रफुल्ल तांबे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात नागरिकांना पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली आहे.